Wednesday 3 November 2010

दिनविशेष नोव्हेंबर - अफझलखान वध : शिवप्रताप दिवस ...


सन १६५५ - १६५६...

दख्खनेमधल्या राजकीय घडामोडींचा फायदा उचलून राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी मारली. शिवरायांनी 'तुम्ही कुठले राजे' असे म्हणणाऱ्या मोरेची मुजोरगिरी मोडून काढली. खुद्द मोरे स्वतःच्या दोन्ही मुलांसकट ठार झाला. वाई ते थेट रायरी असा विस्तीर्ण प्रांत स्वराज्यात सामील झाला. राजांसाठी दक्षिण कोकणद्वार खुले झाले. राजांनी तातडीने पावले उचलत भोरप्याच्या डोंगराचा कायापालट करीत प्रतापगड बांधायला घेतला. बांधकामाची सर्व जबाबदारी मोरोपंत पिंगळे यांसकडे दिली. मराठ्यांच्या कोकणातील हालचालींना वेग आला. ह्या सर्व प्रकाराने संतप्त झालेल्या औरंगजेबाने २२ एप्रिल १६५७ रोजी राजांना पत्र धाडले आणि कोकणातले सर्व महाल (प्रांत) मुघलांच्या हवाली करण्यास बजावले. औरंगजेब त्यावेळेस दख्खनेचा मुघल सुभेदार होता. ह्या पत्रास प्रत्युतर म्हणून राजांनी थेट जुन्नर येथे हल्लाबोल करत मुघली बाजारपेठ लुटली. आता औरंगजेब प्रचंड भडकला. मुघलांनी पुणे, चाकण आणि आसपासच्या प्रदेशात लुट चालवली.

दुसरीकडे मुघलांनी विजापूर विरुद्ध युद्ध सुरू केले होते. त्यांचे कल्याणी आणि बिदर किल्ले मुघलांनी जिंकून घेतले होतेच. मात्र स्वतःला तख्तनशीन करून घेण्यास आतुर असलेला औरंगजेब दिल्लीकडे रवाना होण्यासाठी आतुर झाला होता. त्याने विजापूर बरोबर तह केला आणि तो उत्तरेकडे निघाला. जाता जाता पुन्हा एकदा मराठ्यांनी उत्तर कोकणात उतरत कल्याण-भिवंडी-शहापूर काबीज करत मुघल आणि विजापूरला दणका दिला. माहुली हा अत्यंत महत्वाचा असा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. १६५७ च्या आसपास विजापूरला अली अदिलशाह मरण पावला. वाई प्रांताचा सुभेदार असलेला अफझलखान आता दक्षिणेत मोहिमेवर होता. ह्या दरम्यान शिवरायांनी आपली संपूर्ण ताकद कोकणात वर्चस्व वाढवण्यात घालवली. सोबतीने आरमाराची सुरवात होत होतीच. पहिल्या २० युद्ध नौका त्यांनी बांधायला घेतल्या होत्या. सिद्दी आणि पोर्तुगीझ सतर्क झाले होते. अशा प्रकारे अवघ्या ३-४ वर्षात मराठ्यांनी स्वतः प्रबळ होता होता आपले शत्रू वाढवून घेतले. मुघल, आदिलशाह, पोर्तुगीझ आणि सिद्दी हे मराठ्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष्य ठेवून होते.

बादशहा झाल्या-झाल्या औरंगजेबाने आपला मुलगा मुअझ्झम यांस दख्खनेचा सुभेदार म्हणून औरंगाबाद येथे पाठवले. ही बहुदा मुघली रीत होती. कुठलाही बादशाहा आपल्या मुलाला दिल्लीपासून दूर आणि सर्वात कठीण अश्या दख्खन सुभेदारी वर पाठवत असावा बहुदा. मुअझ्झम मात्र विजापूर विरुद्ध लढायच्या अजिबात तयारीत नव्हता. मुघल आता एक वेगळीच खेळी खेळले. त्यांनी विजापूरला मराठ्यांविरुद्ध युद्ध करण्यास भाग पडले. पूर्वी वाईचा सुभेदार राहिलेला आणि आता विजापूर दरबारातला मानाचा सरदार अफझलखान २२ हजाराची फौज घेऊन १६५९ च्या पावसाळ्याआधी स्वराज्यावर हल्ला करायला, त्याला नेस्तोनाबूत करायला निघाला होता. 'शिवाजी बरोबर कुठल्याही प्रकारे तह करू नकोस. त्याला जिवंत नाहीतर मृत विजापूर दरबारात हजर कर' असे स्पष्ट आदेश त्याला होते. येता-येता खानाने तुळजापूर येथे विध्वंस करीत स्वतःच्या 'बुतशिकन' असल्याची द्वाही फिरवली. वाटेवरून त्याने १६ जून १६५९ रोजी कान्होजी नाईक जेधे यांना पत्र लिहिले आणि 'मावळातल्या सर्व वतनदारांबरोबर आम्हास येऊन मिळा' असा निरोप पाठवला. कान्होजी जेधे चिंताग्रस्त होऊन राजांना भेटायला राजगडी पोचले. आता लढाईची अंतिम रणनीती ठरवणे भाग होते.


नव्याने तयार केलेला जावळीमधला प्रतापगड राजांनी खानाविरुद्ध लढण्यास नक्की केला. एकतर सर्वश्रुत कारण म्हणजे खानाची जडशीळ फौज. पण अजून एक कारण म्हणजे शिवरायांची लढाईची रणनीती. शक्यतो लढाई ही आपल्या प्रदेशात न होता सीमेवर किंवा बाहेर व्हावी ह्या करता ते नेहमी स्वराज्याच्या सरहद्दीवरील किल्ले नक्की करीत. ज्या किल्ल्यावर मी असीन तिथे अफझलखान पोचणार हे राजांना ठावूक होते आणि म्हणूनच त्यांनी प्रतापगड जवळ केला. लढाईचे क्षेत्र खानाने नव्हे तर राजांनी निवडले होते. नकळतच खानाचा पहिला पराभव झाला होता.


सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला एक वाईट बातमी राजगडावरून प्रतापगडी पोचली. गेली २-३ वर्षे दुखणे घेऊन आयुष्य ढकलणाऱ्या महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला होता. शंभू बाळाची आई गेली होती. राजांची राणी गेली. स्वराज्यावर दुख्खाचे आकाश कोसळले. राजे राजगडी पोचले आणि आवश्यक ते विधी पूर्ण करून जिजाऊ मासाहेबांचा 'यशस्वी भव:' आशीर्वाद घेऊन ते पुन्हा प्रतापगडी येऊन ठाकले. दुख्ख करीत बसायला आता त्यांना अजिबात वेळ नव्हता. अफझलखानाचे पत्र त्यांच्याकडे येऊन पोचले होते.

पत्रात खान म्हणत होता (स्वैर अनुवाद)

१. विजापूर दरबाराने निजामशहा कडून जिंकून घेतलेला आणि मुघलांना तहात दिलेला दुर्गम दुर्गांचा हा संपूर्ण डोंगरी प्रदेश तू बळकावून बसला आहेस. तो परत कर.
२. कोकणात राजपुरीच्या राजाला (दंडा राजपुरी येथील सिद्दी) त्रास देणे तू ताबडतोब बंद कर.
३. शत्रूस प्रवेश करण्यास दुर्गम असलेला हा चंद्ररावचा प्रदेश (जावळी) तू मला परत कर.
४. तू कल्याण आणि भिवंडी काबीज केलीस आणि मला कळलाय की तिथे तू मशीद सुद्धा जमीनदोस्त केलीस.
५. तू मुसलमानांना लुटलेस आणि त्यांचा अपमान केला आहेस.
६. इतकेच नव्हे तर तू इस्लामचा अपमान करून स्वतःच्या हाताखाली मुसलमानांना कामावर ठेवले आहेस.
७. तू स्वतःला एक स्वयंघोषित राजा म्हणून, कोणालाही न घाबरता हवे ते निर्णय देतो आहेस. म्हणून तुला संपवायला मला आदिलशहाने पाठवले आहे.
 ८. मुसेखान आणि माझे बाकीचे सैन्य तुझ्याविरुद्ध लढण्यास अतिशय उत्सुक आहे. मी कधी एकदा त्यांना जावळीवर हल्ला करावयास सांगतो असे झाले आहे.
९. सिंहगड आणि लोहगड सारखे दणकट किल्ले, पुरंदर आणि चाकण सारखे मोक्याचे किल्ले, या शिवाय भीमा आणि नीरा नद्यांच्या मधला सर्व प्रदेश मुकाट्याने दिल्लीच्या बादशहाला परत कर.

पत्र वाचल्यावर राजांनी काय विचार केला असेल? शरण जावे? कदापि नाही. तह म्हणजे साक्षात मृत्यू हे राजांना ठावूक होते. अश्या कसोटीच्या क्षणी राजांनी एक वेगळाच व्युव्ह रचला. स्वतःशीच स्मित करीत त्यांनी हे पत्र खानाला लिहिले असावे. (स्वैर अनुवाद)

१. कर्नाटकाच्या सर्व राजांना हरवणारे खुद्द आपण माझ्या भेटीला आलात ह्या सारखा आनंद कोणता.
२. तुम्ही तर या पृथ्वीतलावरचे एक दागिने आहात. तुमच्या बरोबर युद्ध म्हणजे आगीशी लढाई.
३. तुम्ही खरच येथे या आणि मनभरून जावळीचे दर्शन घ्या.
४. तुम्ही लवकरात लवकर इकडे आलात तर बरे होईल, म्हणजे माझी सर्व भीती निघून जाईल.
५. मला मुघल आणि विजापूरच्या सैन्याबद्दल अतिशय आदर आहे ज्यांच्याकडे तुमच्यासारखे पराक्रमी योद्धे आहेत.
६. येथे नक्की या. मी तुम्हाला माझे सर्व किल्ले सुपूर्त करीन. अगदी जावळी देखील.
७. तुमचे रूप म्हणजे एखाद्या वीर योद्धयाप्रमाणे आहे. आपली भेट होईल तेंव्हा मी माझी तलवार तुम्हाला सुपूर्त करीन.
८. जावळीच्या ह्या घनदाट, खोल आणि दूरवर पसरलेल्या जंगलात तुमच्या सैन्याला जगातल्या सर्वोच्च सुविधा मिळतील.

ह्या पत्राने अफझलखानावर नेमका काय परिणाम झाला माहित नाही पण स्वतःचे संपूर्ण जडशीळ सैन्य वाई तळावर ठेवून मोजक्या सैन्यासह खान जावळीमध्ये शिरला. योजिल्याप्रमाणे उन्मत्त हत्तीला जंगलात खेचून आणून मारायचा डाव लवकरचं फत्ते केला जाणार होता.


१० नोव्हेंबर १६५९ ...

पहाटे-पहाटे शिवरायांनी नक्कीच आई तुळजा भवानीची मनोभावे प्रार्थना केली असणार. ठरल्याप्रमाणे शिवाजी राजे आणि अफझल खान एका शामियान्यात भेटले. राजांचा वकील 'पंताजी पंडित' तर खानाचा वकील 'कृष्णाजी भास्कर' यांच्याशिवाय दोघांसोबत १०-१० अंगरक्षक होते. शिवाजी राजांच्या अंगरक्षकांमध्ये संभाजी कावजी, कातोजी इंगळे, सिद्दी इब्राहीम असे काही (जीवा महालाचे नाव माझ्या तरी वाचण्यात आलेले नाही) तर खानाच्या अंगरक्षकांमध्ये रहीमखान, पहलवानखान, शंकराजी मोहिते (सय्यद बंडाचे नाव देखील माझ्या तरी वाचण्यात आलेले नाही) आणि असे काही सैनिक होते.

गडावरून निघताना राजांनी स्वतःकडे एक तलवार, कट्यार आणि वाघनखे ठेवली होती. खानाकडे देखील एक तलवार आणि कट्यार होती. राजांना बघतच तो म्हणाला.'मी तुला प्रत्यक्ष सर्व शक्तिशाली विजापूर दरबारात घेऊन जाऊन आदिलशहासमोर हजर करतो. घाबरू नकोस. हात मिळवणी कर आणि मला आलिंगन दे.' असे म्हणून त्याने राजांना मगरमिठीत घेतले. उंचीला जास्त असणाऱ्या खानाने राजांचे डोके दाबून तो आता पाठीवर कट्यारीने वार करणार तेवढ्यात राजांनी एका क्षणात आपली मान त्या मगरमिठीतून सोडवून घेऊन वाघनखे खानच्या पोटात खुपसली. काही अंतरावर उभे असणाऱ्या अंगरक्षक आणि कृष्णाजी भास्कर यांनाच नव्हे तर खुद्द खानाला देखील अनपेक्षित असा हा हल्ला असणार. पापणी लावण्यास वेळ लागत नाही इतक्या कमी वेळात राजांनी खानाचा कोथळा बाहेर काढला होता. पुढच्या काही क्षणात संभाजी कावजीने खानाचे मुंकडे धडावेगळे केले. कृष्णाजी भास्कर आणि खानाचे सर्व अंगरक्षक तिथल्या तिथे कापले गेले. राजे पंताजी आणि अंगरक्षक घेऊन गडाकडे त्वरित रवाना झाले असणार.


********************************************************************************
१.
कवी भूषण म्हणतो,

एक कहे कल्पद्रुम है, इमि पूरत है सबकी चितचाहे ।
एक कहे अवतार मनोज, की यो तनमे अति सुंदरता है ।
भुषण एक कहे महि इंदु यो, राजविराजत बाढयौ महा है ।
एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है ॥

भाषांतर :
यास कोणी कल्पवृक्ष म्हणतात, कारण हा सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.हा सौंदर्यसंपन्न असल्याने कोणी याला मदनाचा अवतार म्हणतात. भूषण याला पृथ्वीवरचा चंद्र म्हणतो, कारण याचे राज्य कलेकलेने वाढत आहे. कोणी याच्या युद्धातील पराक्रमामुळे यास सिंह म्हणतात तर कोणी प्रत्यक्ष नृसिंह भगवानच समजतात. कारण ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडले तद्वतच शिवरायांनी आपल्या वाघनखांनी अफजलखानाची आतडी बाहेर काढली.

********************************************************************************

अवघ्या काही क्षणात चित्र पालटले होते. शिवाजी आता खानाला भेटणार म्हणजे तह करणार ह्या विचारात असलेल्या खानाच्या फौजेला कसलाच मागमूस लागला नव्हता. तिकडे मराठ्यांनी इशाऱ्याचे कर्णे फुंकले. फौज तयार होतीच. खानाच्या सोबत आलेल्या उरल्या-सुरल्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवला, वाई तळावर असलेल्या फौजेचा सेनापती नेताजी पालकरने धुव्वा उडवला. त्याने मुसेखान आणि फाझलखान यांची दाणादाण उडवून दिली. मोरोपंतांनी पारघाटावर संपूर्ण नियंत्रण मिळवले. अवघ्या काही तासात मराठ्यांनी विजापूरच्या फौजेचा विनाश करत एक प्रचंड मोठा विजय मिळवला. प्रतापगडाच्या साथीने शिवप्रताप घडला. ६५ हत्ती, ४००० घोडे, १२०० उंट, ३ लाख रुपयाचे दागिने, मोठ्या प्रमाणावर उंची कापड, ७ लाख रुपये नकद याशिवाय तोफा, बंदुका आणि सर्व प्रकारचे युद्ध साहित्य मराठ्यांच्या हाती लागले. खानाचे मुंडके राजांनी राजगडी जिजाऊ मासाहेबांना भेट म्हणून पाठवले असे म्हणतात. राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या डाव्या कोनाड्यात ते पुरलेले आहे अशी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. (शहाजी राजांना अटक करणारा आणि थोरल्या संभाजी राजांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या खानाचा मृत्यू हे जिजाऊ मासाहेबांचे एक ध्येय होते. ते राजांनी पूर्ण केले.) मराठ्यांचा आत्मविश्वास कैक पटीने वाढला. नव्या जोमाने राजे पुढच्या मोहिमेच्या आखणीला लागले. नेताजी पालकर ला कोकणात पाठवून ते खुद्द सातारा, सांगली आणि कोल्हापूर प्रांती धडक मारायला निघाले...



********************************************************************************

२.
इतिहासाचे अभ्यासक 'नरहर कुरुंदकर' यांनी अफझलखान वध याबद्दल अतिशय उत्तम विचार मांडले आहेत. ते म्हणतात,"खानवधात एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे दगा कोणी दिला? राजांनी की खानाने? समजा खान सुरक्षित परतला असता तर पुढच्या भेटीत शिष्टाचार म्हणुन राजांना खानभेटीस त्याच्या गोटात जाणे भाग पडले असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला... नव्हे आणलेला खान परत जिवंत जाणे शक्य नव्हते. ती व्यवस्था शिवरायांनी करून ठेवली होती. खानवधापाठोपाठ त्याच्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवणे, वाई तळावर नेताजी पालकरने विध्वंस करणे, मोरोपंतांनी पारघाटावर हल्ला करणे आणि पूर्ण ताकदीनिशी शक्य तितक्या लवकर कोल्हापुर प्रांती धडक मारणे एवढा व्यापक दृष्टिकोन आणि नेमके नियोजन ह्यामागे आहे. अनापेक्षित घाव घालून जग थक्क करता येते पण त्या थक्क अवस्थेतून बाहेर येईस्तोवर शिवराय काही स्थिर कामे करत असतात. ते विजयोस्तव साजरे करत बसत नाहीत. खानवधापाठोपाठ कोल्हापुर - पन्हाळा जिंकणे, कुडाळ मारून विजापुर प्रांती धडक मारणे आणि पुढच्या १८ दिवसात १२०००च्या फौजेचा पराभव करून लूट मारणे व ती फौजा दुप्पट करण्यात वापरणे, आणि ह्या सर्वातून आदिलशाही सावरेपर्यंत जास्तीत जास्त प्रदेश जिंकणे, हे सैनिकी कौशल्य.

"स्थायी यश मिळणाऱ्या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपति शिवराय... "
********************************************************************************
३.

खाली समर्थ रामदास स्वामींनी महाराजांना लिहीलेल्या पत्राची काही कवनं आहेत. यातील प्रत्येक ओळीतील पहिल्या शब्दाच्या, पहिले अक्षर एकत्र करून एक वाक्य तयार होते ते म्हणजे - 'विजापूरचा सरदार निघाला आहे'. हे अफझलखानाबाबत असल्याचे ईमेल फिरत असतात. तसे असल्यास हे पत्र १६५९ चे असावे असा अंदाज बांधता येतो. अर्थात, रामदासांचा संपर्क महाराजांशी तेंव्हापासून होता असे काही पुरावे उपलब्ध नाहीत.. फक्त माहिती म्हणून सदर पत्र येथे दिले आहे.

विवेके करावे कार्यसाधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूढिल भविष्यार्थी मन ।
हाटोची नये ।।१।।

चालू नये असन्मार्गी ।
त्यता बाणल्या अंगी ।
घुवीर कृपा ते प्रसंगी ।
दास महात्म्य वाढवी ।।२।।

जनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।।३।।

दिमाया मूळ भवानी ।
हे सकल ब्रम्हांडांची स्वामिनी ।।


१. ओंकार यांच्याकडून साभार.
२. नरहर कुरुंदकर यांच्या 'छत्रपती शिवाजी महाराज - जीवन रहस्य' आणि 'श्रीमान योगी' मधील पत्रातून साभार.
३. राजेश खिलारी यांच्याकडून साभार.

दुसरा आणि तिसरा फोटो राजेश खिलारी यांच्याकडून साभार...

Tuesday 12 October 2010

दिनविशेष ऑक्टोबर - दुसरी सुरत लुट आणि मराठा - मुघल लढाई ...

१६ वर्षात जे कमावले ते जवळ-जवळ सर्व पुरंदरच्या तहात राजांनी गमावले होते. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. नोव्हेंबर १६६६ मध्ये आग्र्याहून स्वतःची सुटका करून परत आल्यावर शिवरायांनी औरंगजेबाच्या दख्खन सुभेदाराला म्हणजे शहजादा मुअझ्झम याला 'आपण झालेला तह मोडणार नाही' असे पत्र लिहून स्पष्ट कळवले होते. ह्या मागचे राजकारण साधे सरळ होते. लढण्याची ताकद पुन्हा एकदा निर्माण करायला काही अवधी जावा लागणारच होता. १६६७-१६६९ ह्या २ वर्षात मराठ्यांनी इंग्रजांकडून नवीन शस्त्रे विकत घेतली. फौज अधिक वाढवली. विजापूर आणि पोर्तुगिझ यांना आपला धाक दाखवायला मराठा फौज पुन्हा सज्ज झाली होती. पोर्तुगिझांना आणि त्यांच्या संरक्षणात पुंडगिरी करणारया ३ देसायांना धाक बसावा म्हणून राजांनी 'बारदेश मोहीम' आखली, यशस्वी केली आणि पोर्तुगिझांना मराठ्यांचे वर्चस्व मान्य करून तह करणे भाग पडले.

आता सिद्दीने मराठ्यान विरोधात कुरापती सुरु केल्या. उघडपणे इंग्रज आणि पोर्तुगिझ लपून त्याला मदत करत होते. खुद्द मुघल सिद्दीला मराठ्यांविरोधात उद्युक्त करीत होते. तिकडे उत्तरेत सप्टेंबर १६६९ मध्ये औरंगजेबाने बनारसमध्ये मंदिरे तोडण्याचा सपाटा चालवला. शिवरायांना ह्या गोष्टीचा नक्कीच प्रचंड राग आलेला असणार. डिसेंबर महिन्यात औरंगाबाद येथे असणारे प्रतापराव आणि आनंदराव मराठा फौज घेऊन राजगडी परत आले. मराठे आणि मुघल यांच्या मधला तह मोडला होता. पुन्हा मराठे - मुघल तह झाला तो ३७ वर्षे लढल्यावर आणि औरंगजेबाच्या मृत्युनंतर...

फेब्रुवारी १६७० मध्ये मराठे विस्मयजनकरित्या मुघलांवर तुटून पडले. ४ फेब्रुवारी १६७० रोजी 'सुभेदार तानाजी मालुसरे' यांनी कोंढाणा जिंकून ह्याची सुरवात करून दिली. गड-किल्ल्यांवर, पायथ्याला, मैदानात, जंगलात, डोंगरात जिकडे दिसेल तिकडे मुघली फौजेवर मराठा फौज तुटून पडली. लोहगड, रोहिडा, माहुली आणि पुरंदरच्या तहात दिलेले किल्ले एकामागून एक पुन्हा एकदा मराठ्यांनी जिंकून घेतले. शिवाय मुघलांचे काही किल्ले आणि जहागीर लुटायचे काम सुरु केले. फेब्रुवारी ते जुलै महिन्यापर्यंत मुघल फौजेच्या हालाला पारावर राहिला नव्हता. पावसाळ्याच्या शेवटाला अजून एक धक्कादायक बातमी दिल्लीला पोचली. 'शिवाजीने पुन्हा सुरत लुटली.'

१०,००० पायदळ आणि १०,०००  घोडदळ, पंत प्रधान मोरोपंत पिंगळे, सेनापती प्रतापराव, उपसेनापती आनंदराव ह्या सर्वांना सोबत घेऊन ३ ऑक्टोबर रोजी खुद्द शिवराय सुरत येथे जाऊन पोचले. सुरतेच्या वेशीवरून त्यांनी सुरतेच्या मुघली सुभेदाराला पत्र पाठवले. 'बादशहामुळेच मला माझ्या जनतेचे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी फौज उभी करावी लागत आहे. तेंव्हा त्या फौजेचा खर्च सुद्धा तुमच्याच प्रांतातून द्यायला हवा. मी तिसऱ्यांदा आणि शेवटचे सुरतेच्या उत्पन्नाचा चौथा भाग मागत आहे.'

(संभाजीराजांच्या ठाणे-रामनगर मोहिमेदरम्यान सुद्धा मराठ्यांनी सुरतेकडून 'दुसऱ्यांदा' चौथवसूल केली होती.)


ह्या पत्रामध्ये शिवाजीराजांचा हेतू आणि उद्देश स्पष्ट दिसून येतो.

'I demand for the 3rd time, which I declare to be the last, chauth part of revenue under your government. As your emperor has forced me to keep an army for the defense of my people & country, that army must be paid by his subjects.'

ह्या नंतर सुद्धा सुभेदाराकडून काहीच उत्तर मिळाले नसल्याने मराठ्यांनी ३ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर असे तब्बल ३ दिवस निवांतपणे सुरत लुटली. इतक्या प्रचंड वेगाने २०००० मराठा फौज सुरतेवर पुन्हा हल्ला करेल असे कोणाला स्वप्नात देखील वाटते नव्हते. पण जे शत्रूला अपेक्षित नसते नेमके तेच करण्यात शिवराय तत्पर होते. मराठ्यांनी आपला डाव साधला होता. जिथल्या वेगाने ते सुरतेच्या दिशेने गेले तितक्याच वेगाने लुट घेऊन ते आता परतीच्या मार्गावर निघाले होते. दख्खनेचा मुघल सेनापती दाऊदखान त्यांना अडवायला रवाना झाला होता. मराठा फौज बागलाणमध्ये 'वणी-कांचन' येथे पोचल्याची बातमी त्याला मिळाली होती. दख्खन सुभेदार मुअझ्झमने बाकीखानाला अधिक कुमक आणि रसद घेऊन दाऊदखानाकडे पाठवले. तर बाकीखानाची वाट बघणाऱ्या दाऊदखानाने मराठ्यांचा माग काढायला इखलास खानमियाना याला पुढे धाडले होते.

मराठ्यांची १५००० फौज आघाडीला दौडत असताना इखलास खानमियाना याने सेनापती दाऊदखान आणि बाकीखानाची वाट न बघता मराठ्यांवर हल्ला चढवला. अर्थात तो त्याचा मोठाच मूर्खपणा ठरला. तो स्वतः त्याच्या फौजेसकट जबर जखमी झाला. मराठ्यांनी मुघल फौजेची सरसकट कत्तल चालवली. काही काळाने दाऊदखान आणि बाकीखान तेथे येऊन पोचले. मुघलांची बहुदा लढाईची कसलीच तयारी झालेली दिसत नव्हती. मुघल फौजेने मराठा फौजेकडून सपाटून मार खाल्ला. मुघलांसोबत असणाऱ्या 'बुंदेले' सैन्याने मराठ्यांना कसे बसे रोखून धरले होते. मराठ्यांचे लक्ष देखील लढाई करणे नव्हते. सोबत असलेला 'करोडो'चा खजिना सुखरूप मार्गी लावणे हे त्यांचे प्रथम उदिष्ट्य होते. संपूर्ण दिवसात मराठ्यांनी 'बेरीरगिरी' म्हणजे 'शत्रुला चोहूबाजूने घेरून केली जाणारी फिरती लढाई' या तंत्राने मुघलांना हैराण करून सोडले. १६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी मराठा फौजेने पुन्हा एकदा मुघलांवर जबर हल्ला चढवत आपली पुढची वाट मोकळी करून घेतली आणि ते सुरतेच्या लुटीसकट पुढे सटकले. मराठ्यांची पिछाडीची फौज मुघलांना गुंगारा देत, मध्येच लढत लुटी पासून दूर घेऊन जात होती.

मराठे - मुघल तह मोडल्यानंतर पहिल्यांदाच सामोरा-समोरच्या लढाईत मराठ्यांनी मुघली फौजेला पराभूत केले होते. खुद्द शिवराय जातीने ह्या लढाईमध्ये सामील होते. स्वतःची भूमी गानिमापासून मुक्त करण्यासाठी ते आसुसलेले होते. सुरत लुट सुरक्षितरित्या राजगडाच्या वाटेवर नेण्यात मराठ्यांना यश आलेच. पण इतक्यावर ते थांबले नाहीत. शिवरायांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना त्रिंबक, औंढा, पट्टा, रवळ्या-जावळ्या हा नाशिक आसपासचा संपूर्ण भाग काबीज करण्याच्या कामगिरीवर पाठवले आणि शिवराय खुद्द करंजारंजा, बेरर ह्या खानदेश भागात शिरले. मुघली भागात त्यांनी प्रचंड लुट चालवली.


थोडक्यात शिवरायांनी मुघलांना पूर्णपणे जमीनदोस्त करण्याच्या दिशेने एक मजबूत पाउल उचलले होते. आता ते मागे हटणार नव्हते.

स्वसंरक्षणाचा सर्वोत्तम पर्याय होता... शत्रूच्या प्रदेशात आक्रमण...

Sunday 19 September 2010

दिनविशेष सप्टेंबर - जलदुर्ग खांदेरी

जलदुर्ग खांदेरी. समुद्री मार्गाने मुंबईच्या मुखाशी असणारा एक अत्यंत महत्वाचा असा जलदुर्ग शिवरायांनी राजापुरी येथील सिद्दी आणि मुंबई मधील इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारला. उदिष्ट्ये २ होती. एक म्हणजे सिद्दीला जमिनीपाठोपाठ आता समुद्री मार्गाने सुद्धा कोंडीत पकडायचे आणि मुंबईला इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखायचे. तसेच दुसरे म्हणजे थेट मुंबई वर तलवारीचे टोक ठेवायचे. इंग्रजांना धाकात ठेवायचे. मराठ्यांनी इंग्रजांशी केलेल्या राजकारणाचा हा एक मोठा भाग होता.
शिवरायांनी खांदेरीच्या बांधणीपासून ते आंग्र्यांनी इंग्रजांना पाणी पाजेपर्यंत अनेक महत्वाच्या घडामोडी खांदेरी बाबत घडल्या. त्या संदर्भात एक विस्तृत पोस्ट मी लवकरच लिहेन. सध्या पाहूया त्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी ज्या सप्टेंबर महिन्यातल्या होत्या. बघुया त्या नेमक्या काय होत्या.
 
२८ नोव्हेंबर १६७० रोजी ३००० फ़ौज सोबत घेउन दुर्गबांधणी संदर्भात खांदेरी बेटाची शिवरायांकडून ३ दिवस पाहणी झाली होती. खांदेरी बेत पूर्णपणे ताब्यात घेऊन पुढे लवकरच या ठिकाणी दुर्गबांधणी सुरू झाली.
 
९ सप्टेंबर १६७१ - इंग्रजांच्या मुंबई येथील गवर्नरने त्याच्या साहेबाला शिवरायासंदर्भात पत्र लिहीले. पत्रात तो म्हणतो,"शिवाजीच्या हाती खांदेरी असणे म्हणजे मुंबईवर टांगती तलवार आहे."

"khanderi in the hands of shivaji is a dagger pointed at the heart" (Mumbai)"


७ सप्टेंबर१६७९ - सिद्दी आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यान्नी खांदेरी भोवती १ मी. उंचीचा तट उभारून पूर्ण केला.

११ सप्टेंबर१६७९ - दर्यासारंग दौलतखान कुमक घेउन इंग्रजांबरोबरच्या लढाईसाठी माईनाक भंडारीच्या मदतीला खांदेरी येथे पोचला.

इंग्रजांची 'हंटर', 'रिवेंज' आणि इतर ३ लढाउ जहाजे खांदेरीला वेढा टाकून उभी होती. दौलतखानाने इंग्रज अधिकारी 'केग्विन'चा पाडाव केला, माईनाक भंडारीला रसद पोचती केली आणि 'नागाव'ला पुन्हा रसद घेण्यासाठी परत गेला.

७ सप्टेंबर १८१४ - दुसऱ्या बाजीरावने पांडुरंग कोल्हटकर मार्फ़त 'उंदेरी - खांदेरी'चा ताबा पुन्हा मिळवला.

खांदेरी संदर्भात झालेल्या लढायांचे विस्तृत वर्णन लवकरच 'इतिहासाच्या साक्षीने' या ब्लोगवर येईलच.

Monday 16 August 2010

१७ ऑगस्ट १६६६... आग्र्याहून सुटका... एक थरारक पलायन...


१६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले. आजही तुम्ही कधी पुरंदरला गेलात तर मुरारबाजींचा पुतळा बघून त्यांच्या शौर्याची गाथा कळते. किल्लेदाराबरोबर किल्लाही पडला.

तह व्हायच्या आधी शिवाजीराजांनी मिर्झाराजाला एक पत्र पाठवले होते. या पत्रामधून तत्कालीन परिस्थितीचे आणि शिवरायांच्या मन:स्थितीचे यथार्थ चित्रण झाले आहे. हे पूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."
सर्वत्र सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन राजांनी मुघलांशी तह करायचे ठरवले. पुरंदरचा तह घडला. १६ वर्षात जे कमावले ते सर्व या तहात राजांनी गमावले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. तहानंतर शिवाजीराजे कुतुबशहा आणि आदिलशहाच्यासाथीने मुघलांविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करतील अशी भिती मिर्झाराजाला होती म्हणून त्याने बादशहाला कळवले की 'कुठल्याही परिस्थितीत शिवाजीला आपल्याकडे वळवून घ्यायला हवे. त्यासाठी मी शिवाजीला आपल्या दरबारी पाठवत आहे.' मिर्झाराजाने राजांना आग्रा येथे जाण्यास तयार केले आणि त्याप्रमाणे ५ मार्च १६६६ रोजी राजे आग्रा येथे जाण्यास निघाले. स्वतःच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त खुद्द औरंगजेबाने त्यांना पत्र पाठवून आमंत्रित केले होते. 'मनात कुठलीही चिंता किंवा शंका न ठेवता मला भेटायला या. आपला येथे सत्कार केला जाईल आणि तुम्हाला पुन्हा दख्खनेत जाण्याची मुभा असेल.' मजल-दरमजल करत शिवाजीराजे १२ मे रोजी तेथे पोचले.


................. आणि 'दिवाण-ए-खास' मध्ये जे घडले तो इतिहास आहे. जोगळेकर त्यांच्या सह्याद्री ग्रंथात म्हणतात,
''आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला. धन्य त्यांची की हे वैभव पाहून स्वदेशी परत आल्यावर त्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले."

त्या दिवशी नेमके काय घडले हे अधिक जाणून घेण्यासाठी येथे जा ... Threat to Life ...

परिणाम ठरलेला होता. राजे नजरकैदेत टाकले गेले. अर्थ स्पष्ट होता. मृत्यू.... कधी? केंव्हा? कसा? काहीच ठावूक नव्हते. दख्खनेतून जयसिंगने 'शिवाजीस मारू नये. तसे केल्यास इकडे परिस्थिती हाताबाहेर जाईल पण इकडे सुद्धा येऊ देऊ नये' असे पत्र औरंगजेबाला पाठवले. औरंगजेबाने राजांना काबुल मोहिमेवर पाठवायचे ठरवले. अर्थात राजांनी बादशहाची कुठलीच गोष्ट मानायला साफ नकार दिला. परिस्थिती अधिक बिकट होत होती. कुठल्याही क्षणी आपला मृत्यू समोर येईल हे राजांना ठावूक होते. अखेर एक योजना आखली गेली. थरारनाट्य ठरले. राजांबद्दल आग्र्याच्या बाजारात अफवा पसरत होत्या. खुद्द जसवंतसिंग औरंगजेबाला सांगत होता. 'शिवाजीकडे दैवी शक्ती आहे. तो १४-१५ हात लांब उडी मारू शकतो. एका फटक्यात ४०-५० कोस अंतर तो चालून जातो.' दुसऱ्या दिवसापासून बादशाहने स्वतःभोवतीची सुरक्षा अधिक वाढवली. राजांबरोबर असलेले संभाजीराजे मात्र नजर कैदेत नव्हते. त्यांना फिरायला मुभा होती. त्यांच्या सोबत सर्जेराव जेधे आग्र्याबद्दल इत्यंभूत माहिती काढत. योजना हळूहळू पुढे सरकत होती. ७ जून रोजी राजांनी सोबत असलेल्या सर्व सेवक आणि सैन्याला परत दख्खनेत पाठवून दिले. सोबत होते फक्त संभाजीराजे, हिरोजी फर्जंद, सर्जेराव, रघुनाथ बल्लाळ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर आणि मदारी मेहतर.



१७ ऑगस्ट १६६६. दिवसा-ढवळ्या, १००० सैनिक खडा पहारा देत असताना राजे नजरकैदेतून पसार झाले. ते नेमके कसे निसटले ह्याबाबाबत कुठलाच ठोस पुरावा उपलब्ध नाही. 'मिठाईचा पेटारा'ची कथा जी काल्पनिक आहे ती मुघली कागदपत्रांमधून घेतलेली आहे. औरंगजेबाने शोध मोहीम काढली. पण आता खूप उशीर झाला होता. एक थरारक पलायन यशस्वी झाले होते. राजांनी मुघलांची शेवटची चौकी २० ऑगस्ट रोजी चक्क खोटे दस्तक दाखवून पार केली. चौकीदार होता लातिफखान. औरंगजेबाला जेंव्हा हे कळले तेंव्हा त्याने 'लातिफखान बेवकूफ है' असे उद्गार काढल्याची नोंद मुघल कागदपत्रांमध्ये आहे. आता संभाजीराजांना मथुरेला विश्वासरावांकडे ठेवून शिवाजीराजे वेगाने पुढच्या मार्गाला निघाले. आपल्या ९ वर्षाच्या मुलाला मागे ठेवून जाताना त्यांना काय वाटले असेल...!!! पण एकत्र जाणे धोक्याचे होते तेंव्हा त्यांना काळजावर दगड ठेवून तो निर्णय घ्यावा लागला असणार. तिकडे आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार फुलौतखानाला सापडले. शिवाजीराजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजीराजे मथुरेतून खासच पकडले गेले असते, व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते. राजांनी थेट दख्खनेचा रस्ता न धरता मुघलांच्या आवाक्याबाहेरचा मार्ग घेतला होता. मथुरेवरून अलाहाबाद - बनारस - गया - गोंडवन आणि तिथून गोअळकोंडा. वाटेत ठिकठिकाणी शत्रूशी त्यांची गाठ पडली. त्यांनी संन्याश्याचा वेश धारण केला. जास्तीतजास्त प्रवास पायी केला. अथक परिश्रम करून राजे दख्खनेत पोचले. पण अजून संभाजीराजे मथुरेमध्येच होते. शिवाजीराजे राजगडी पोचल्याची बातमी आग्र्याला पोचली तेंव्हा मुघलांची शोध मोहीम थांबली. रस्ता अधिक सुरक्षित झाल्यावर विश्वासराव संभाजीराजांना घेऊन खुद्द राजगडी पोचले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती.


हताश झालेला औरंगजेब आता फारसे काही करू शकत नव्हता. आता काय कधीच काही करू शकत नव्हता. त्याच्या मनात एकच सल होता. 'एक क्षणाच्या निष्काळजीपणाचं पर्यावसान शिवाजीच्या पलायनात झाल्यामुळे खूप मोठी किंमत चुकवावी लागली आहे. मराठ्यांबरोबरच्या युद्धाला आता कधीही अंत नाही हे तो उमगला होता.'

३१ वर्षानंतर '२१ फेब्रुवारी १७०७' रोजी नगर येथे म्हातारा बादशहा हाच सल घेऊन 'अल्लाला प्यारा' झाला. दख्खन तो कधीच जिंकू शकला नाही...

Saturday 14 August 2010

१५ ऑगस्ट १६६४ - कोकणातला रण झंझावात ...

१६५९ ते १६६३ याकाळात अफझलखानाचा वध, पन्हाळ्याहून सुटका, शाहिस्तेखानावर लालमहालात हल्ला आणि अखेर सूरत बेसूरत करून शिवरायांनी १६६३ मध्ये दख्खनेमधल्या मोघल सुभेदाराला पत्र पाठवले. त्यात त्यांनी म्हटले आहे की 'आपल्या भुमीचे संरक्षण करणे हे माझे कर्त्तव्य आहे आणि मी आपले कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही' स्वराज्य निर्मिती पाठोपाठ आता त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी आक्रमकांशी युद्ध खेळण्यास ते सज्ज झाले होते. दुसरीकडे सुरत लुटीचा प्रचंड धक्का बसलेल्या औरंगजेबाने विजापूरला मराठ्यांविरुद्ध ३० हजार होन मदत करून कोकणात उतरायला भाग पडले. विजापूरचा सरदार खवासखान १६६४ चा पावसाळा संपता-संपता कोकणात उतरला. त्याने थेट कुडाळ काबीज केले.

त्या मागोमाग खुद्द राजांनी सुद्धा कोकणात मुसंडी मारली आणि खवासखानाचा वेंगुर्ला येथे पराभव करून ते जिंकले. या दरम्यान विजापूरचा वतनदार 'बाजी घोरपडे' आणि सावंतवाडीचे 'सावंत' खवासखानला मदत करण्यासाठी येऊन पोचण्याआधी मुधोळ येथे बाजी घोरपडेला मारून राजे कूड़ाळ प्रांती आले आणि तेथे खवासखानाला पुन्हा पराभूत केले. ही लढाई १५ ऑगस्ट १६६४ रोजी घडली. शिवरायांनी ह्या त्रिवर्गास एकत्र न होऊ देता एकएकटे पाडून त्यांचा बिमोड केला यातच त्यांचे रणकौशल्य दिसून येते. खुद्द खवासखान कोकण सोडून विजापूरला माघार घेऊन पळून गेला. तर या युद्धात बाजी घोरपडे मारला गेला. त्याची गादी राजांनी नष्ट केली. (बाजी घोरपडे याने १६४८ मध्ये शहाजी राजांना पकडून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.) सावंत पोर्तुगीझांच्या आश्रयाला गोव्याला पळाला. राजांनी त्याचा माग काढत काही पोर्तुगीझ भूभाग देखील काबीज केला. अखेर पोर्तुगीझांनी खंडणी म्हणून अनेक नजराणे राजांना पाठवून दिले.

कुडाळ येथून राजांनी मासाहेब जिजाऊ यांना पत्र पाठवले.

पूर्ण पत्र येथे वाचा. --- "स्वामींचे पुण्यप्रतापें आज्ञेप्रमाणे घडून आलें."

१६६४ मध्ये कोकणात बसलेले मराठ्यांचे बस्तान अखेरपर्यंत कोणीच उखडू शकले नाही.....

१४ ऑगस्ट १६६० - चाकण उर्फ़ संग्रामदुर्गचा संग्राम ...

अफझलखान वधाने हादरलेल्या आदिलशहाने दुप्पट मोठी फौज देऊन रुस्तुम-ए-जमा याला पुन्हा मराठ्यांवर हल्ला करायला धाडले. त्याच्या सोबत होता बापाच्या वधाचा सूड उगवायला आलेला अफझलखानाचा मुलगा फाझलखान. ह्या प्रचंड फौजेचा शिवरायांच्या नेतृत्वखाली पराभव करत मराठ्यांनी कोल्हापूर पावेतो मजल मारली आणि आदिलशाहीचा सर्वात बळकट असा 'पन्हाळगड' काबीज केला.

आता स्थिती अजून हाताबाहेर जायच्या आधी आदिलशहाने सिद्दी जोहरला त्याहूनही अधिक फौज देऊन मराठ्यांवर पाठवले. (ह्यावरून कल्पना करा की ज्या शक्तींच्या विरुद्ध राजे स्वराज्य उभे करत होते त्या किती बलाढ्य होत्या) सिद्दीने पन्हाळ्याला वेढा घातला आणि मराठ्यांच्या हालचाली थांबल्या. वेढा उठवण्यासाठी नेतोजी पालकर बेळगाव, अथणी आणि खुद्द विजापूरपर्यंत धडका मारत होता... वेढा उठवायची शर्थ करत होता. पण त्याला यश येत नव्हते.

अशात ६ महिने होऊन गेले. पावसाळा उजाडला तरी शिवराय पन्हाळ्यावर वेढ्यामध्ये बंदिस्त होते. तिकडे उत्तर सीमेवर मुघल फौजेने स्वराज्यावर हल्ला चढवला होता. औरंगाबाद वरून निघालेल्या शाही फौजा शास्ताखानाच्या नेतृत्वाखाली थेट पुण्याला पोचल्या होत्या. शास्ताखान स्वराज्यावर चालून आला तो थेट संग्रामदुर्गावर. हा किल्ला सहज आपल्या हातात पडेल असा त्याचा भ्रम असावा. पण ती विसरला असावा की उंचावर असलेला १ सैनिक खालच्या १० सैनिकांच्या बरोबर असतो. शिवाय किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. एक खरे-खुरे लढवय्ये मराठा. पावसाळ्याची सुरवात होणार होती म्हणून किल्ल्यात दाणा-गोटा पुरेपूर भरला होता. किल्ल्यात ३००-३५० फौज होती. वेढा पडला तरी किल्ला सहज सहजी हाती पडायची सुतराम शक्यता नव्हती.

मुघलांनी वेढा घालून मोर्चे बांधले आणि तोफांचा भडीमार करू लागले. मुघल सैनिक किल्ल्याच्या तटा-बुरुजाशी लगट करू लागले की त्यांच्यावर गोफणगुंडे बसायचे. एक अत्यंत साधे पण सर्वात लांब जाणारे प्रभावी असे अस्त्र होते ते आणि अर्थात मराठे त्यात पूर्णपणे निष्णात होते. फिरंगोजी नरसाळा यांनी अवघ्या ३००-३५०च्या फौजेनिशी किल्ला तब्बल ५५ दिवस लढवला. अखेर मुघलांनी तटापर्यंत पोहोचायला भुयार खोदायला सुरवात केली. त्यांना किल्ल्यातून प्रचंड प्रतिकार होत होता. अखेर मुघलांना १४ ऑगस्ट १६६० रोजी अश आले. भुयार खणून मुघलांनी तटबुरुज उडवले. किल्ल्याची एक बाजू उघडी पडली.  हातघाईची प्रचंड लढाई झाली. आपल्या सैनिकांची वाताहत होणार हे लक्ष्यात येताच त्यांना महाराजांचे शब्द नक्कीच आठवले असतील.

राजे म्हणत,'आपण राखून गनीम घ्यावा. माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी'

शेवटी फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. सर्व फौजेला घेऊन ते थेट राजगडी आले. महाराज तोपर्यंत वेढ्यातून सुटून राजगडी पोचले होते. किल्ला हातचा गेला म्हणून महाराजांची भेट त्यांनी खिन मनानेच घेतली असेल. पण आपल्या प्रत्येक माणसाची राजांना अचूक ओळख होती. ते फिरंगोजीना म्हणाले असतील,'फिरंगोजी. केवढा पराक्रम केला. असे हताश का?'

किल्ला हातातून गेला तरी फिरंगोजीच्या पराक्रमावर खुश होउन शिवाजीराजांनी फिरंगोजी नरसाळा यांना भूपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली. फिरंगोजी ताठ मानेने आणि नव्या उत्साहाने आपल्या नव्या मोहिमेवर निघाले...

Saturday 7 August 2010

स्वराज्याची पहिली लढाई - ८ ऑगस्ट १६४८

१६४८ च्या सुरवातीला आदिलशाहीचे पुरंदर आणि सिंहगड असे मात्तबर किल्ले शिवाजी राजांनी ताब्यात घेतले. अखेर शिवाजी महाराजांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेउन आदिलशाहने जुलै १६४८ मध्ये शिवाजी राजांवर हल्ला करण्याचे ठरवले. खुद्द शहाजी राजांची साथ असल्याशिवाय शिवाजी हे धाडस करणार नहीं अशी खात्री असल्याने आदिलशहाने शहाजी राजांना २५ जुलै १६४८ रोजी कपटाने कैद केले आणि शहाजीराजांच्या बंगळूरप्रांती आदिलशाही फ़ौज धाडली. तर एक फ़ौज पुण्याच्या दिशेने चालून आली. शहाजीराजे खुद्द कैदेत होते मात्र बंगळूरवरचा हल्ला त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू) यांनी यशस्वीपणे परतावला.

दुसरीकडे अवघ्या १८ वर्षाचे शिवाजी राजे आदिलशाही सैन्याला भिडायला सज्ज झाले होते. पुणे - सातारा मार्गावर असणाऱ्या खळत-बैलसर येथे स्वराज्याची पहिली मोठी लढाई झाली. ही लढाई ८ ऑगस्ट १६४८ रोजी झाली. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या फौजेचा शिवाजी राजांनी सपशेल पराभव केला. फत्तेखानाच्या ३००० फौजेविरुद्ध खुद्द शिवाजीराजे चालून गेले. ह्या लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. तर पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी दुसऱ्या एका लढाइत 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले.

आदिलशाहीचा पहिला मोठा हल्ला मराठा फौजेने परतावला होता. मात्र नुकतेच बाळसे धरलेल्या स्वराज्यापुढील धोका टाळण्यासाठी आणि शहाजीराजांची सुटका करण्यासाठी शिवाजीराजांनी सिंहगड आदिलशाहीला परत केला.

Thursday 1 July 2010

दिनविशेष - जुलै महीना ...सळसळलेल्या इतिहासाचा ... !

जुलै महीन्याला मराठ्यांच्या दिनविशेषामध्ये अतिशय विशेष स्थान आहे... काय नाही घडले जुलै महिन्यात.... मग वर्ष कुठलेही असो... तुम्हीच वाचून बघा... जुलै महीना कसा सळसळलेल्या इतिहासाचा आहे...

ज्या-ज्या शब्दांना लिंक्स दिल्या आहेत त्या आवर्जुन वाचा...


 १ जुलै १६९३ - छत्रपति संभाजी राजांच्या मृत्यूनंतर मोघलांकड़े गेलेल्या सिंहगडचा ताबा 'नवजी बलकावडे' या सरदाराने परत स्वराज्यात आणला.


४ जुलै १७२९ - सरखेल कान्होजी आंग्रे स्मरणदिन. समाधी स्थळ - ठुकराली नका, अलिबाग.

६ जुलै १७३५ - मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास आले तेव्हा पेशवे बाजीराव थोरले त्यांना भेटण्यास घोरपडीपावेतो सामोरे गेले.
८ जुलै १९१० - स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेल्सच्या (फ्रांस) समुद्रात उडी घेतली.

१२ जुलै १६६० - पावनखिंड - बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली. जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओशाळवले.

" तोफे आधी न मरे बाजी. "

"दर काही मिनिटांना पालखीचे भोई बदलत, वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत ते ६०० वीर विजेच्या वेगाने पळत सुटले होते. उदिष्ट एकच होत - विशाळगड़. हातात नंग्या तलवारी घेउन बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते. मागचे आणि पुढचे हेर बित्तंबातमी राजांकड़े पोचवत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती. क्षण अन क्षण आता महत्त्वाचा होता" ... पुढे वाचा...

११ जुलै १६५९ - शिवाजी राजे अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी राजगड वरुन निघून प्रतापगड येथे पोचले.



१२ जुलै १९०८ - लोकमान्य टिळकांना मंडालेची सहा वर्षांची शिक्षा झाली, या घटनेला १२ जुलै रोजी १०२ वर्षे पूर्ण.

१५ जुलै १६७४ - मुघल सरदार बहादूरखान कोकलताश याच्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. सुमारे १ कोटीची लूट रायगडावर जमा झाली

२० जुलै १७६१ - माधवराव यांनी पेशवेपदाची सूत्रे हाती घेतली.

२२ जुलै १६७८ - तामीलनाडू मधील वेलोरचा किल्ला रघुनाथपंत व आनंदराव मकाजी यांनी जिंकला.

२३ जुलै १८५६ - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १५३ वी जयंती.

२५ जुलै १६६६ - औरंगजेबाने शिवरायांसोबत आग्रा येथे आलेल्या मराठा फौजेचे परतीचे परवाने शिवरायांकड़े सुपूर्त केले.

२५ जुलै १६४८ - विजापूर बादशाहाच्या आज्ञेने मुस्तफाखानाने 'जिंजी'नजीक शहाजी राजांना कैद केले.


३१ जुलै १६५७ - मुघलांनी विजापुरचा 'कल्याणी' किल्ला जिंकून घेतला.

Sunday 13 June 2010

दिनविशेष - जून महीना ... भाग २

१३ जून १६६५ - शिवाजी राजे आणि मिर्झाराजे जयसिंह यांच्यात इतिहास प्रसिद्द पुरंदरचा तह.
Read more in English -  War with Jaisingh – Treaty of Purandar

१३ जून १७०० - औरंगजेब स्वतः सज्जनगड बघण्यास गडावर पोचला. दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड ९ जून रोजी जिंकला होता.

१४ जून १७०४ - मुघलांच्या कैदेत असलेल्या छत्रपति संभाजी यांच्या पुत्र शाहूचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.

१५ जून १६७० - मराठ्यांनी सिंदोळा घेतला.

१५ जून १६७५ - कारवारची मोहिम आटोपून छत्रपति शिवाजी महाराज रायगडावर परतले.

१६ जून १६५९ - विजापुरच्या आदिलशाहने शिवाजी राजांविरुद्ध अफझलखान याला एप्रिल १६५९ मध्ये मोहिमेसाठी मुकरर केले होते. १६ जून रोजी आदिलशाहने वाई आणि तळकोकणातल्या सर्व वतनदरांना फर्मान पाठवले आणि शिवाजी राजांविरुद्ध खानाला येउन मिळण्यास सांगितले.

१६ जून १६७० - माहुली किल्ल्याची किल्लेदारी मनोहरदास गौडा याने सोडली. नविन किल्लेदार आला अलिवर्दि बेग. शिवाजी महाराजांनी छापा घालून माहुली - भंडारदुर्ग आणी पळसखोल ही दुर्गत्रयी जिंकली.

१७ जून १६७४ - राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब पुण्यतिथी. मराठा साम्राज्याचे २ छत्रपति निर्माण करण्याऱ्या या राष्ट्रमातेला कोटि कोटि प्रणाम...!!!

१७ जून १६३३ - अस्त होणाऱ्या निजामशाहीला नवसंजीवनी देण्याचे राजे शहाजी आणि मुरार जगदेवाचे अखेरचे प्रयत्न. ६ वर्षाच्या 'मुर्तिझा'ला गादीवर बसवून निजामशाही चालवण्याचे प्रयत्न.

१८ जून १६६५ - ९ वर्षाचे शंभूराजे मुघल छावणीमध्ये मनसबदारी स्विकारण्यास हजर. पुरंदरच्या तहानुसार शिवाजीराजांना बाळ शंभू राजांसाठी मनसबदारी स्विकारणे भाग पडले होते.

Thursday 10 June 2010

दिनविशेष - जून महीना ... भाग १

१ जून १९९८ - दुर्गमहर्षी 'गोपाळ निलकंठ दांडेकर' यांची पुण्यतिथी. हा दिवस 'दुर्गदिन' म्हणून साजरा केला जातो.

८ जून १६७० - पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवरायांनी पुनश्च जिंकून घेतला.

८ जून १७०७ - औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि अझमशाह ह्या त्याच्या २ मुलांमध्ये दिल्लीच्या तख्तसाठी युद्ध झाले. ह्यात मुअज्जमने अझमशाहला ठार करून दिल्लीची गादी बळकावली.

८ जून १७१३ - पंतप्रतिनिधि यांनी सिद्दी कडून रायगड किल्ला राजकारण साधून जिंकून घेतला. १६८९ साली रायगड सिद्दीने मुघलांसाठी जिंकला होता.

९ जून १६९६ - छत्रपति राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव 'शिवाजी' ठेविले.

९ जून १७०० - दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.

९ जून १७१८ - पूर्ण ताकदीनिशी इंग्रज आंग्र्याँच्या विजयदुर्ग येथील आरमारावर चालून गेले. बरेचसे आरमार आंग्र्यान्नी पावसाळ्यासाठी नांगरुन ठेवले होते. तरीसुद्धा उत्कृष्ट संरक्षण क्षमता आणि सागराचा वापर ह्यामुळे इंग्रज ९ दिवस प्रयत्न करून पराभूत होउन मुंबईला परत गेले.

१० जून १६७६ - छत्रपति शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरवात. राजाभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमेमागचे सूत्र होते.

१० जून १६८१ - औरंगजेबचा मुलगा पाछ्चा उर्फ़ अकबर छत्रपति संभाजी महाराजांच्या शरणार्थ आला. त्यास संभाजी राजांनी नेतोजी पलकर आणि हीरोजी फर्जद यान समवेत पाली येथील सुधागड जवळ ठेविले.

१० जून १७६८ - पेशवे माधवराव आणि राघोबादादा यांसमध्ये धोडोपची लढाई. माधवरावने लढाई जिंकून राघोबास पराभूत केले.

१२ जून १७३२ - सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संभाजी आणि मानाजी ह्या २ मुलांमध्ये सरखेल पदासाठी झगडा सुरु होता. अखेर १२ जून १७३२ रोजी त्यांच्यात लढाई सुरु झाली.

.
.
क्रमश: .....

Sunday 6 June 2010

शिवप्रभुंची नजर फिरे अन उठे मुलुख सारा ...

दहादिशांनी एकमुखाने एकघोष केला...

मरणपाश तोडून राजसा सिंह मुक्त जाहला...

पंखामधले जागे जाहले उद्दानाचे भान...

गरुड़भरारीसाठी जाहले पुन्हा खुले अस्मान...

जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजेच शिवराजाभिषेक दिनाच्या शुभेच्छा ...

 
 
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा

हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा

हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा

हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा


करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना

करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना

तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना

गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या

हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा


जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी

जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी

जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी

जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी


ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे

ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे

ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या

हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा.

Saturday 29 May 2010

दिनविशेष - मे महीना ... भाग ३

२३ मे १७३७ - पोर्तुगीझांकडून जिंकल्यानंतर पेशवे थोरले बाजीराव यांनी अर्नाळा किल्ला पुनश्च बांधून घेतला.

२५ मे १६६६ - शिवाजी राजांची आग्रायेथील नजर कैद सुरु. आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला. १२ मे १६६६ रोजी शिवाजीराजे हिंदुस्तानचा बादशहा औरंगजेब यांस त्याच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त भेटले होते.

२६ मे १७३३ - पेशवे थोरले बाजीराव यांनी आबाजीपंत पुरंदरे यांना सिद्दी संदर्भात पत्र लिहिले. पत्रात ते म्हणतात,"सिद्दीचे २ हात जबरदस्त आहेत. एक अंजन वेल आणि दूसरा उंदेरी. प्रतिनिधी अंजनवेलीस जातील तर उत्तम आहे. सरखेल उंदेरिस खटपट करतील. ते दोन्ही स्थळे हातात आलीयावर याची किंमत कमी होइल आणि आसराही तूटेल."

२७ मे १७०२ - दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने अखेर तह करून विशाळगड ताब्यात घेतला. पन्हाळगड - पावनखिंड जिंकून विशाळगड ताब्यात घ्यायला त्याला बरोबर १ वर्ष लागले.
२७ मे १८२५ - डॉ. बरनाडी पेरेस डिसिल्वा या गोमंतकाला पोर्तुगीझांनी गवर्नर बनवले. याने तेरेखोलच्या किल्ल्यामधून पोर्तुगीज सत्तेविरुद्धच उठाव केला. पण हा उठाव टिकला नाही. २७ मे रोजी प्रचंड हत्याकांड करून तो पोर्तुगीझांनी दाबला.

२८ मे १६७४ - शिवाजी महाराज यांची राजाभिषेकाच्या 10 दिवस आधी मुंज करण्यात आली.
२८ मे १७०१ - दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने पन्हाळगड - पावनखिंड जिंकला. आता तो निघाला विशाळगड जिंकायला.

***औरंगजेबाने अखेर तह करून विशाळगड २७ मे १७०२ रोजी ताब्यात घेतला. पन्हाळगड - पावनखिंड जिंकून विशाळगड ताब्यात घ्यायला त्याला बरोबर १ वर्ष लागले.***

२८ मे १६६४ - सिंहगडावरील निकामी हल्ल्यानंतर हताश होउन जसवंतसिंह वेढा उठवून औरंगाबादला परतला. नोवेम्बर १६६३ पासून तो सिंहगड किल्ल्यास वेढा घालून बसला होता.

***५ एप्रिल १६६३ रोजी सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा घातला. 'चैत्र शुद्ध अष्टमी' म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी आणि मुस्लिम लोकांच्या रोज्याच्या ६ व्या दिवशी धक्कादायक असा छापा. खान कसाबसा पसार मात्र खानाची ३ बोटे कापली. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट औरंगाबादला जाउन थांबला. मात्र त्याने जसवंतसिंह यांस सिंहगड किल्ल्या जिंकायची आज्ञा केली होती.***

२९ मे १६७४ - शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ९ दिवस आधी 'तूळापुरुषदान विधी' आणि 'तूळादान विधी' संपन्न.

३० मे १६७४ - शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ८ दिवस आधी 'विनायक शांती विधी' संपन्न.

३१ मे १६७४ - शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ७ दिवस आधी प्रीत्यर्थ संस्काराचा एक भाग म्हणून सोयराबाई, सकवारबाई, पुतळाबाई यांच्याशी प्रतिकात्मक पुनर्विवाह करण्यात आला.

३१ मे १७२५ - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिवस.

Friday 28 May 2010

बाजी जात बुलेंदकी ... राखो बाजी लाज ...

२३ मे १७२९ - पेशवे थोरले बाजीराव यांनी अलाहाबादचा सुभेदार महम्मदखान बंगश याचा दारूण पराभव केला. महम्मदखान बंगश मोठे सैन्य घेउन बुंदेलखंडावर चाल करून आला तेंव्हा राजा छत्रसाल याने पेशवे थोरले बाजीराव यांच्याकड़े मदत मागितली. पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात,

"जो गति ग्राह गजेन्द्र की सो गत भई है आज ... बाजी जात बुलेंदकी राखो बाजी लाज"

आपल्या २५ हजार घोड़दळासकट बाजीराव त्याच्या मदतीस धावून गेला. त्यानी आधी बंगशची पूर्ण रसद तोडली आणि त्याला मुघल बादशाह कडून कुठलीच मदत मिळू दिली नाही. जयपुरकडून बंगशचा मुलगा कैमखान बापाच्या मदतीस धावला पण बाजीरावने त्याचा जयपुरजवळ पूर्ण पराभव केला. आता बंगशने पूर्ण शरणागती पत्करली आणि 'राजा छत्रसाल' वर पुन्हा हल्ला करणार नाही असे कबूल करून आपली सुटका करून घेतली. राजा छत्रसालने बाजीरावला केलेल्या मदतीबद्दल त्याचा काल्पी, झांसी, सागर, सिरोंज, हरदेनगर हा वार्षिक महसूल ३३ लाख उत्पन्नाचा भाग बाजीरावास बहाल केला.

Friday 14 May 2010

दिनविशेष - मे महीना ... भाग २

१५ मे १७३१ - छत्रपति शाहूराजे (सातारा गादी) तळेगाव-दाभाडे येथे जाउन त्र्यंबक दाभाडे यांच्या मातोश्रींचे स्वांतन करण्यासाठी त्यांस भेटले. दाभाडे हे पेशवे थोरल्या बाजीरावांच्या हातून लढाईमध्ये मारले गेले होते.

१६ मे १६४९ - विजापुरच्या आदिलशहा कडून शहाजीराजांची सुटका झाली. शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि मुघलांचा दख्खनेचा सुभेदार शहजादा मुराद यास १४ मार्च १६४९ रोजी पत्र लिहिले होते. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर १६ मे १६४९ रोजी शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.

१९ मे १६७४ - शिवाजी महाराजांनी राजाभिषेकाच्या आधी प्रतापगडावरील भवानी मातेसमोर मंगलकलश प्रस्थापित केला.

२० मे १६६५ - राजगडाहून शिवाजी महाराजांनी आपले वकिल रघुनाथपंत 'पंडितराव' यांस मिर्झाराजा जयसिंह यांच्याकडे पुरंदर तहासंदर्भात बोलणी करण्याकरिता रवाना केले.

२१ मे १६७४ - शिवाजी महाराज प्रतापगडाहून रायगडास निघाले. प्रतापगड येथे ते ३ दिवस राहिले आणि त्या दरम्यान त्यांनी तेथील विराजमान झालेल्या आदिशक्ति तुळजा भवानीस १.२५ मण वजनाचे छत्रचामर अर्पण केले आणि मातेसमोर मंगलकलश प्रस्थापित करून राजाभिषेकाआधी देवीचा आशीर्वाद घेतला.
 
.
.
क्रमश: .....

छत्रपति संभाजी महाराजांची ३५३वी जयंती ... !



१४ मे १६५७ - संभाजी राजांचा पुरंदर गडावर जन्म. (ज्येष्ठ शुक्ल द्वादशी) त्यांच्या ३५३ व्या जयंती निमित्त त्रिवार मुजरा आणि अभिवादन ...

दिनविशेष - मे महीना ... भाग १

१ मे १६६५ - पुरंदरचा सफेद बुरूज स्फोटात उडाला. वज्रगडापाठोपाठ माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात गेल्याने आता मराठे पुरंदरच्या बालेकिल्ला कसोशीने लढवू लागले. दोन्हीकडूनही पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर एकच एल्गार सुरू झाला.

१ मे १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात १ मे १८१८ रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला.

३ मे १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ३ मे १८१८ रोजी मेजर एल्ड्रिजने जीवधन किल्ला जिंकला.
४ मे १७३९ - वसई विजयोत्सव दिन.. वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला. खुद्द चिमाजीआप्पा किल्ल्यासमोर उभे राहिले ह्यानंतर मराठ्यान्नी एकच एल्गार केला आणि ४ वर्षे सुरु असलेला पोर्तुगीजांविरुद्धचा लढा वसईकिल्ला जिंकून संपवला.

५ मे १६६३ - गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले.

१६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गादी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती. १६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती.

६ मे १६५६ - रायरी हा किल्ला शिवरायांनी जिंकला आणि त्याचे रायगड असे नामकरण केले. रायरी हा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. अखेर काही महिन्यांनंतर मोरेला मारून राजांनी ६ मे १६५६ रोजी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

९ मे १६६० - शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरानदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती. ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले.

१० मे १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात प्रचंड तोफांचा मारा करून मेजर प्रोथेरने रायगड किल्ला उध्वस्त केला. ४-१० मे असे ६ दिवस ही कारवाई सुरु होती. अखेर १० मे रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

११ मे १७३९ - मराठा आणि पोर्तुगीज यांच्या मध्ये तहाची अंतिम बोलणी होउन पोर्तुगीज कायमचे गोव्याला निघून गेले. ४ मे १७३९ रोजी वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा 'सरसुभेदार शंकराजी केशव' यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.
१२ मे १६६६ - शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोचले. त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते.

हिंदुस्तानचा बादशहा औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांची ही पाहिली आणि अखेरची अशी एतिहासिक भेट. पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी शिवाजी राजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.
१३ मे १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात इंग्रज अधिकारी 'मॅन्रो' ने वसंतगड जिंकला.

.
.
क्रमश: ...

Saturday 1 May 2010

१ मे १९६० - १ मे २०१० - महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव ... !

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व ज्ञात-अज्ञात विरांचे स्मरण करून सर्वांना शुभेच्छा ...


वंदे महाराष्ट्र... वंदे शिवराय...



मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील १०६ हुतात्मे  -


१] सिताराम बनाजी पवार

२] जोसेफ डेव्हिड पेजारकर

३] चिमणलाल डी. शेठ

४] भास्कर नारायण कामतेकर

५] रामचंद्र सेवाराम

६] शंकर खोटे

७] धर्माजी गंगाराम नागवेकर

८] रामचंद्र लक्ष्मण जाधव

९] के. जे. झेवियर

१०] पी. एस. जॉन

११] शरद जी. वाणी

१२] वेदीसिंग

१३] रामचंद्र भाटीया

१४] गंगाराम गुणाजी

१५] गजानन ऊर्फ बंडू गोखले

१६] निवृत्ती विठोबा मोरे

१७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर

१८] बालप्पा मुतण्णा कामाठी

१९] धोंडू लक्ष्मण पारडूले

२०] भाऊ सखाराम कदम

२१] यशवंत बाबाजी भगत

२२] गोविंद बाबूराव जोगल

२३] पांडूरंग धोंडू धाडवे

२४] गोपाळ चिमाजी कोरडे

२५] पांडूरंग बाबाजी जाधव

२६] बाबू हरी दाते

२७] अनुप माहावीर

२८] विनायक पांचाळ

२९] सिताराम गणपत म्हादे

३०] सुभाष भिवा बोरकर

३१] गणपत रामा तानकर

३२] सिताराम गयादीन

३३] गोरखनाथ रावजी जगताप

३४] महमद अली

३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे

३६] देवाजी सखाराम पाटील

३७] शामलाल जेठानंद

३८] सदाशिव महादेव भोसले

३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे

४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर

४१] भिकाजी बाबू बांबरकर

४२] सखाराम श्रीपत ढमाले

४३] नरेंद्र नारायण प्रधान

४४] शंकर गोपाल कुष्टे

४५] दत्ताराम कृष्णा सावंत

४६] बबन बापू भरगुडे

४७] विष्णू सखाराम बने

४८] सिताराम धोंडू राडये

४९] तुकाराम धोंडू शिंदे

५०] विठ्ठल गंगाराम मोरे

५१] रामा लखन विंदा

५२] एडवीन आमब्रोझ साळवी

५३] बाबा महादू सावंत

५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर

५५] विठ्ठल दौलत साळुंखे

५६] रामनाथ पांडूरंग अमृते

५७] परशुराम अंबाजी देसाई

५८] घनश्याम बाबू कोलार

५९] धोंडू रामकृष्ण सुतार

६०] मुनीमजी बलदेव पांडे

६१] मारुती विठोबा म्हस्के

६२] भाऊ कोंडीबा भास्कर

६३] धोंडो राघो पुजारी

६४] ह्रुदयसिंग दारजेसिंग

६५] पांडू माहादू अवरीरकर

६६] शंकर विठोबा राणे

६७] विजयकुमार सदाशिव भडेकर

६८] कृष्णाजी गणू शिंदे

६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले

७०] धोंडू भागू जाधव

७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे

७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर

७३] करपैया किरमल देवेंद्र

७४] चुलाराम मुंबराज

७५] बालमोहन

७६] अनंता

७७] गंगाराम विष्णू गुरव

७८] रत्नु गोंदिवरे

७९] सय्यद कासम

८०] भिकाजी दाजी

८१] अनंत गोलतकर

८२] किसन वीरकर

८३] सुखलाल रामलाल बंसकर

८४] पांडूरंग विष्णू वाळके

८५] फुलवरी मगरु

८६] गुलाब कृष्णा खवळे

८७] बाबूराव देवदास पाटील

८८] लक्ष्मण नरहरी थोरात

८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान

९०] गणपत रामा भुते

९१] मुनशी वझीऱअली

९२] दौलतराम मथुरादास

९३] विठ्ठल नारायण चव्हाण

९४] देवजी शिवन राठोड

९५] रावजीभाई डोसाभाई पटेल

९६] होरमसजी करसेटजी

९७] गिरधर हेमचंद लोहार

९८] सत्तू खंडू वाईकर

९९] गणपत श्रीधर जोशी

१००] माधव राजाराम तुरे(बेलदार)

१०१] मारुती बेन्नाळकर

१०२] मधूकर बापू बांदेकर

१०३] लक्ष्मण गोविंद गावडे

१०४] महादेव बारीगडी.

१०५] कमलाबाई मोहिते

१०६] सिताराम दुलाजी घाडीगांवकर

.
.
ह्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम !!!

आभार... ऑरकुट दिनविशेष कम्युनिटी...

Saturday 10 April 2010

दिनविशेष - एप्रिल महीना ... भाग ३

१७ एप्रिल १६७५ - फोंड्याच्या स्वारीमध्ये मराठा फौजांनी छत्रपति शिवरायांच्या उपस्थितीत किल्ल्याचा मुख्य बुरुज उडवला.

१७ एप्रिल १७२० - बाळाजी बाजीराव यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी पेशवेपद बाजीरावास बहाल केले. हा सोहळा कर्‍हाड जवळील मसुरे गावी संपन्न झाला.

१७ एप्रिल १७३९ - छत्रपती शाहू महाराज आणि नानासाहेब यांची म्हैसळ गावी भेट.

१८ एप्रिल १७०३ - महत् प्रयासाने औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. गडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट बघत तो तिकडेच ठाण मांडून बसला. पावसाळा संपला की राजगडकडे कूच करायचा त्याचा मनसुबा होता.

१८ एप्रिल १७७४ - पेशवे सवाई माधवराव यांचा किल्ले पुरंदरावर जन्म.

१९ एप्रिल १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी किल्ले आणि महत्वाची शहरे ताब्यात घेतली. त्यात १७ एप्रिल रोजी नाशिक शहराचा पूर्ण ताबा कॅप्टन ब्रिजने मिळवला.

२० एप्रिल १७४० - रावेरखेडी (सध्या मध्यप्रदेश येथे) मुक्कामी थोरले बाजीराव पेशवे यांची प्रकृति बिघडली.

२० एप्रिल १७७५ - नारो शंकर यांचे पुत्र रघुपंत नारायण यांचा पेशव्यांतर्फे जहाँगीर देउन सत्कार. नारों शंकर यांचा जानेवारी १७७५ मध्ये मृत्यू झाला होता. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांच्या पश्चात् त्यांचा मुलाला जहाँगीर दिली गेली.

२१ एप्रिल १७०० - दख्खन स्वारीमध्ये औरंगजेबाने साताऱ्याचा किल्ला जिंकला. आता त्याने आपला सरदार फत्ते-उल-खान याला सज्जनगड जिंकण्यास पाठवले.

२१ एप्रिल १७७९ - सवाई माधवराव पेशवे यांची पुण्यामधील पर्वती येथे मुंज संपन्न.

२२ एप्रिल १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात २२ एप्रिल १८१८ रोजी मात्र कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश.

२४ एप्रिल १६७४ - भोर-वाई प्रांतामधला जिंकायचा बाकी राहिलेला एकमेव असा केंजळगड स्वतः शिवरायांनी राजाभिषेकाच्या ४२ दिवस आधी स्वारी करून जिंकला.

२४ एप्रिल १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात २४ एप्रिल १८१८ रोजी मात्र कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात यश. २२ एप्रिल १८१८ रोजी मात्र कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले होते.

२९ एप्रिल १६६१ - शिवाजी राजांनी फेब. ते मे १६६१ मध्ये ४ महिन्यांची कोकणात मोहिम काढली. त्यात त्यांनी श्रृंगारपुर २९ मे ला जिंकून घेतले.

३० एप्रिल १६५७ - शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर हल्ला करून ते लुटले.

Thursday 8 April 2010

दिनविशेष - एप्रिल महीना ... भाग २

९ एप्रिल १६३३ -मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला.

९ एप्रिल १६६९ - उत्तर हिंदूस्थानातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेबाकडून विशेष फौज तैनात.

१० एप्रिल १६९३ - १६८९ मध्ये राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज 'जिंजी' (सध्या तामिळनाडू मध्ये) येथे गेले होते. तेथेच त्यांनी स्वतःला राजाभिषेक करवून घेतला आणि राज्याची सूत्र काही काळासाठी त्यांनी तिकडून पाहिली. ह्या दरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी त्यांनी भेट कोल्हापुर गादीचे शहाजीराजे (दुसरे) यांची भेट घेतली.

११ एप्रिल १७३८ - वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली. त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती.

१२ एप्रिल १७०३ - मुघल फौजांचा सिंहगडावर तोफांचा मारा सुरु. औरंगजेब स्वतः जातीने सिंहगड जिंकून घेण्यास हजर.

१३ एप्रिल १७०४ - संग्रामदूर्ग उर्फ़ चाकणचा किल्ला सोडून औरंगजेब खेड उर्फ़ राजगुरुनगरकड़े निघाला.

१३ एप्रिल १७३१ - छत्रपति शाहू (सातारा) आणि छत्रपति संभाजी (कोल्हापुर) यांच्यात राज्याच्या सिमेवरुन वाद.

१४ एप्रिल १६६५ - इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेरखानाने वज्रमाळ किल्ला जिंकला. ३१ मार्च रोजी पुरंदरचा वेढा सुरु झाला होता.

१४ एप्रिल १८९५ - लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने रायगडावर पहिला २ दिवसीय शिवस्मरण दिन साजरा.

१५ एप्रिल १६४५ - शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या १५ एप्रिल रोजी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी शिवाजी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली.

१५ एप्रिल १६६७ - शिवाजी राजे आणि पुतळाबाई यांचा विवाह.

१५ एप्रिल १६७३ - स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाण विरुद्ध मोठी लढाई जिंकली.

१५ एप्रिल १७३९ - वसई किल्ल्यावरील मराठ्यांच्या हल्यामध्ये पोर्तुगीज ऑफीसर पिंटो आणि सिलवेरा यांचा मृत्यू.

१६ एप्रिल १७७५ - आनंदीबाईसाठी फितूरी करणाऱ्या येसाजी विश्वासराव आणि रामचंद्र सावंत यांना अशेरीगडच्या किल्लेदाराने मारून टाकले.

Wednesday 7 April 2010

दिनविशेष - एप्रिल महीना ... भाग १

२ एप्रिल १७२० - छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि पेशवेशाहीचे पहिले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांचे निधन.

३ एप्रिल १६८० - चैत्र शुद्ध पौर्णिमा शके १६०२ ... म्हणजेच हनुमान जयंती रोजी 'छत्रपति शिवाजी महाराजांचे महानिर्वाण.'

४ एप्रिल १७७२ - पेशवे माधवराव यांची तब्येत खालावल्याने त्यांच्या पत्नी रमाबाई त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्यासाठी हरिहरेश्वर येथे गेल्या.

५ एप्रिल १६६३ - सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा. चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी आणि मुस्लिम लोकांच्या रोज्याच्या ६ व्या दिवशी धक्कादायक असा छापा. खान कसाबसा पसार मात्र खानाची ३ बोटे कापली. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट औरंगाबादला जाउन थांबला.

५ एप्रिल १७१८ -मराठा सरखेल 'कान्होजी आंग्रे' यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला. पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र पाठवले. "तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होउन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही."

६ एप्रिल १७५५ - पेशव्यांनी (खरे तर इंग्रजांनी) तूळाजी आंग्रे याच्याकडून फत्तेगड आणि कनकदुर्ग जिंकुन घेतले. २२ मार्च १७५५ रोजी झालेल्या इंग्रज - पेशवे तहाप्रमाणे इंग्रज मराठा नौदलावर म्हणजेच तूळाजी आंग्रेवर (सुवर्णदुर्गावर) स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले होते.

७ एप्रिल १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ७ एप्रिलला 'देवगड' विनासायास इंग्रजांच्या ताब्यात गेला.

८ एप्रिल १६५७ - २७ वर्षीय शिवाजीराजे आणि काशीबाई यांचा विवाह.

८ एप्रिल १६७४ - राजाभिषेकापूर्वी प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे सरनौबत पद 'हंभिरराव मोहिते' यांस बहाल.

८ एप्रिल १६७८ - 'दक्षिण दिग्विजय' मोहिम जिंकून छत्रपति शिवाजी महाराजांचे पन्हाळगड येथे आगमन.

८ एप्रिल १७८३ - आनंदराव धुळूप यांनी इंग्रज आरमाराविरुद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली.


क्रमश: ...

Tuesday 16 March 2010

दिनविशेष - मार्च महीना ... भाग २

१४ मार्च १६४९ - शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि मुघलांचा दख्खनेचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र लिहले. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.

१५ मार्च १६८० - शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र 'राजाराम' यांचे प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी म्हणजेच 'ताराऊ उर्फ़ ताराबाई' हिच्याशी लग्न. त्यांचे नाव लग्नानंतर बदलून 'सिताबाई' असे ठेवले.
 
१६ मार्च १६७३ - १२ वर्षानंतर पन्हाळा स्वराज्यात पुन्हा दाखल झाल्यानंतर शिवाजी महाराज पन्हाळगड येथे पोचले. अवघ्या ६० मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जदने ६ मार्च १६७३ रोजी किल्ला जिंकला होता.
 
१९ मार्च १६७४ - राजाभिषेकापूर्वी शिवरायांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई वारल्या.
 
२१ मार्च १६८० - शिवरायांनी कुलाबा उर्फ़ अलिबाग किल्ल्याची बांधणी सुरु केली. ह्यानंतर अवघ्या १४ दिवसात ३ एप्रिल १६८० रोजी राजांचे महानिर्वाण झाले आहे.
 
२२ मार्च १७५५ - इंग्रज - पेशवे यांचा तह. यान्वये इंग्रज मराठा नौदलावर म्हणजेच तूळाजी आंग्रेवर (सुवर्णदुर्गावर) स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले. तूळाजी आंग्रे जुमानीत नाही म्हणून स्वतः पेशवे आपल्याच आरमाराच्या जीवावर उठले होते.
 
२४ मार्च १६७७ - दक्षिण दिग्विजयाप्रसंगी शिवरायांचा श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम. भाग्यनगर (सध्याचे हैदराबाद) पासून काही अंतरावर असलेल्या या पवित्रस्थानी राजांचे काही काळ वास्तव्य होते. येथे असलेल्या गोपुरास 'श्री शिवाजी गोपुर' असे नाव असून तेथे शिवरायांचे हातात तलवार घेतलेले दगडामधले कोरीव शिल्प पहावयास मिळते.
 
२७ मार्च १६६७ - शिवरायांना सोडून आधी आदिलशाही आणि मग मुघलांना शामिल झालेल्या नेतोजी पालकरांचे औरंगजेबकडून धर्मांतर. नेतोजी पालकरांचा मुहंमद कुली खान बनवला गेला.
 
३० मार्च १६४५ - शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या एप्रिल महिन्यात वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले. या पत्रामुळे दादाजी चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना खालील पत्र पाठवले. 'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' या आशयाचे पत्र पाठवले. आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही धारणा त्यांनी ह्या पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढवले आहे. पूर्ण पत्र येथे वाचा.

३१ मार्च १६६५ - इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा वेढा सुरु. मिर्झा जयसिंह व दिलेरखान पठाण पुरंदरच्या पायथ्याशी २९ मार्च येऊन दाखल झाले होते.

Monday 15 March 2010

गुढीपाडवा आणि छत्रपति संभाजी महाराज ... !

गुढीपाडव्याच्या नेमक्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्येला औरंगजेबाने छत्रपति संभाजी महाराजांचा वढू - तूळापूर येथे शिरच्छेद केला.

१ फेब १६८९ रोजी शंभुराजे आणि कवी कुलेश यांना संगमेश्वर येथे कैद केले गले होते. बहादुरगड़ येथे त्यांच्यावर भयानक आणि असंख्य हाल केले. पहिल्यादिवशीच त्यांचे नेत्र फोडले गेले. त्यांची जीभ कापली गेली. कोडे मारून नंतर अंगावरील चामडी सोलण्यात आली. इतके करून देखील मराठा छत्रपति आपल्याला दाद देत नाही हे बघता अखेर ११ मार्च १६८९ ला म्हणजे फाल्गुन अमावस्येला त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

आमचे कोल्हापुरचे मित्र संभाजी यांनी या दिवसानिमित्त लिहिलेली कविता फोटो सकट देत आहे.


दिनविशेष - मार्च महीना ... भाग १

२ मार्च १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात २ मार्च १८१८ रोजी इंग्रजांनी सिंहग़डावर तोफा डागायला सुरवात केली.

३ मार्च १६६५ - मोगल सरदार मिर्झाराजा जयसिंह लाखभर सैन्य घेउन शिवरायांशी लढण्यासाठी पुण्यात येउन दाखल झाला. 3 वर्षात शिवाजी महाराजांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले होते. शाहिस्तेखानाची बोटे कापली. सुरत बेसुरत केली आणि त्यावर मोगल सरदारांना पत्र लिहून आपले उद्दिष्ट स्पष्ट कळवले होते. आता औरंगजेबाला आपला सर्वात जिगरबाज सरदार दखखनेमध्ये पाठवणे भाग होते.
 
४ मार्च १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ४ मार्चला विसापूरचा किल्ला कर्नल प्रौथरने तोफा डागून उद्धवस्त केला. आता किल्ल्याची काही मीटरभर तटबंदी योग्य स्थितीत उरली आहे.
 
५ मार्च १६६६ - औरंगजेबाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी शिवाजी राजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.
 
६ मार्च १६७३ - १२ वर्षानंतर पन्हाळा स्वराज्यात पुन्हा दाखल. अवघ्या ६० मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जदने किल्ला जिंकला. अन्नाजी दत्तो, गणोजी कावले आणि मोत्याजी खालेकर हे सोबतचे सरदार.


शिवरायांनी पन्हाळ्यावरुन सुटका करून घेतल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीला द्यावा लागला होता. तो राजाभिषेकापूर्वी स्वराज्यात यावा असे शिवरायांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी कोंडाजीला रायग़डी बोलावून मोहिमेआधीच सोन्याचे कड़े बक्षिष म्हणून दिले आणि 'यशस्वी होउन या' असे सांगूनच मोहिमेवर पाठवले.
 
७ मार्च १६४७ - दादाजी कोंडदेव यांचे पुणे येथे वृद्धापकालाने निधन.
 
८ मार्च १६७० - पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर-वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून काबीज केला. ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी अतोनात प्रयत्न केले होते, तोच पुरंदर निळोपंतांनी अवघ्या २४ तासात काबीच केला.
 
९ मार्च १६५० - तूकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. फाल्गुन वद्य द्वितीया, शके १५७१, प्रथम प्रहर.
 
१० मार्च १६७३ - रायगडाहून पन्हाळगडाकडे जाताना वाटेत शिवाजी महाराजांचा प्रतापगडावर मुक्काम. प्रतापगडास भवानी देवीची शोडषोपचारे पूजा.


१० मार्च १६७७ - ५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीतील भागानगर (हैद्राबाद) येथील मुक्काम आटोपून शिवरायांचे दक्षिणदिग्वीजयास्तव दक्षिणेकडे प्रस्थान.

१० मार्च १७०४ - औरंगजेबाने स्वतःच्या ८९ व्या वाढदिवसाला तोरणा उर्फ़ प्रचंडगड़ जिंकला.
 
११ मार्च १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात कर्नल प्रौथरने ११ मार्चला कोरीगड़वर हल्ला केला. ४ दिवसांनी दारूकोठार तोफेत नष्ट झाल्याने अखेर मराठ्यांनी शरणागती पत्करली.

Thursday 18 February 2010

१८ फेब्रुवारी - ब्लॉग समाप्ती ... !

दोस्तहो... आज माझ्या अनेक ब्लोग्सचा पहिला वाढदिवस. गेला वर्षभर विविध ब्लोग्समधून 'मराठ्यांच्या इतिहास' आणि 'सहयभ्रमंती'वर लिखाण सुरू होतेच. त्यातील 'मराठा इतिहासाची दैनंदिनी' या ब्लॉगची आज ह्या ब्लॉगपोस्टने  समाप्ती होत आहे.

गेल्या वर्षी १९ फेब. रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून मी मध्ययुगीन इतिहासावर काही दिनविशेष आपल्यासमोर मांडले. आज १ वर्षानंतर पुन्हा एकदा शिवरायांना वंदन करून ह्या ब्लॉगची समाप्ती करत आहे. धन्यवाद ... !

.
.
नोंद : जसे जसे नवीन दिनविशेष वाचनात येतील तसे तारखेप्रमाणे ते येथे नोंदवले जातील ह्याची नोंद घेणे. अन्यथा महिन्यातून एकदाच आधीचे सर्व दिनविशेष पून्हा प्रकाशित केले जातील.

Wednesday 17 February 2010

१७ फेब्रुवारी

१७ फेब्रुवारी - वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी.

" ज्या भूमीचे पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करीत उपाशी मरावे, आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत रहावे, हे मला पाहवले नाही आणि म्हणून ब्रिटिश सरकारविरूद्ध मी बंड पुकारले !"

"अहो माझ्या हिंदुस्थानवासी बांधवहो, तुमच्या कल्याणासाठी मी माझे प्राण पणास लावीत आहे. असा प्रयत्न करण्यातही मी काय पुरुषार्थ केला ? दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांच्या कल्याणासाठी नाही का काढून दिल्या ? तसेच माझे प्राण घेऊन तरी इश्वराने तुम्हांला सुखी करावे, अशी माझी त्याला प्रार्थना आहे !"

"मी मरून जाईन. पण या दुष्ट, प्रजाभक्षक, चांडाळ इंग्रजांना मेल्यानंतरही मी शांतता लाभू देणार नाही."

                                                                                                                    - वासुदेव बळवंत फडके ...

१६ फेब्रुवारी १७०४

१६ फेब्रुवारी १७०४ - औरंगजेबने राजगड़ जिंकून त्याचे नाव नबिशाहगड़ ठेवले. येथून तो पुढे किल्ले तोरण्याकडे निघाला.

१५ फेब्रुवारी १७४५

१५ फेब्रुवारी १७४५ - पेशवे माधवराव यांचा जन्मदिवस.

१३ फेब्रुवारी १६३०

१३ फेब्रुवारी १६३० - मुघल बादशाह शाहजहाँ आदिलशाही आणि निझामशाही संपवण्याच्या उद्देशाने खानदेश येथील बुरहाणपुर येथे पोचला.

११ फेब्रुवारी १८१८

११ फेब्रुवारी १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांवर हल्ला चढवला. त्यात ११ फेब.ला इंग्रजांनी किल्ले अजिंक्यतारा वर ताबा मिळवला.

११ फेब्रुवारी १६७१

११ फेब्रुवारी १६७१ - होळीच्या सणाचा फायदा उठवून सिद्दी कासिम याने दंडा राजपूरी येथील सामराजगड़ जिंकला.

११ फेब्रुवारी १६६०

११ फेब्रुवारी १६६० - औरंगजेबाने मुख़्तारखान याला दख्खनेची जबाबदारी सोपवून औरंगाबाद येथे पाठवले.

Tuesday 9 February 2010

८ फेब्रुवारी १६६५

८ फेब्रुवारी १६६५ - स्वतःचे आरमार उभारल्यानंतर शिवरायांनी पहिली आरमारस्वारी कर्नाटकमधील 'बिदनूर'वर काढली. या मोहिमेकरता मालवण बंदरातून ५० गलबते, ३ मोठ्या तारवा आणि ४००० सैनिकांची फौज बिदनूरकडे निघाली. राजांनी स्वतः ह्या सागरी स्वारीचे नेतृत्व केले.

१६६४ मध्ये सिंधुदुर्गाची पायाभरणी, सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग यांची मजबूती वाढवल्यावर सिद्दी आणि पोर्तुगीझ यांच्यावर मराठ्यांची पकड़ बसू लागली होती. आपले सागरी वर्चस्व सिद्ध करण्याकरता अश्या मोहिमेची आवशक्यता मराठ्यांना होती. या मोहिमेत मराठ्यांनी 'बिदनूर' मधून विजापुरकडे जाणारा २ करोड़ होन इतका खजिना लूटत मोहिम यशस्वी केली.

८ फेब्रुवारी १७१४

८ फेब्रुवारी १७१४ - 'सरखेल कान्होजी आंग्रे' आणि 'छत्रपति शाहू महाराज' यांच्यात वळवंड, लोणावळा येथे तह. १७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट (कोल्हापुर आणि सातारा गादी) पडल्यावर कान्होजी आंग्रे कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला होता. पुढे त्यांचे बालमित्र असलेले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांनी त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर तह करवला.

Friday 5 February 2010

५ फेब्रुवारी १७६६

५ फेब्रुवारी १७६६ - पेशवे माधवराव आणि हैदराबादच्या निजमाची कुरूमखेड येथे भेट.

Thursday 4 February 2010

५ फेब्रुवारी १६७० - 'सुभेदार तानाजी मालुसरे'

५ फेब्रुवारी १६७० - 'सुभेदार तानाजी मालुसरे' यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन सिंहगड स्वराज्यात परत आणला.






गडावर किल्लेदार उदयभानु राठोड आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० सैनिक होते. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. अंधारातच त्यांनी कडा चढून सर केला आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. हातघाईच्या लढाईमध्ये जबर जखमी होउन ते मृत्यू पावले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. त्याक्षणाची राजे राजगडावरुन आतूरतेने वाट बघत होते. तो इशारा बघताच राजे कदाचित मनातल्या मनात म्हणाले सुद्धा असतील,'तानाजीने आधी कोंढाण्याचे लग्न लावलेच.' पण तेंव्हा राजांना माहीत कुठे होते की कोंढाण्याचे लग्न लावता-लावता त्यांचा बालसखा तानाजी आपला मुलगा रायबाचे लग्न न लावताच दूर निघून गेला होता... दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी मिळाली. अत्यंत दुख्खी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठ' (पोलादपुरजवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'विरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आहे. स्मारकामध्ये असलेला त्यांचा भरदार मिशांचा अर्धाकृती पुतळ्यासमोर उभे राहिल्यावर ऊर अभिमानाने भरून येतो.


नकळत हात छातीकडे जात आपण म्हणतो ... 'मुजरा सुभेदार' ...!!!

Wednesday 3 February 2010

३ फेब्रुवारी १८३२

३ फेब्रुवारी १८३२ - रामोशी जातीमधील 'उमाजी नाईक खोमणे' यांना पुण्यातील मामलेदार कचेरीच्या आवारात इंग्रजांनी फासावर लटकावले.

१८१८ नंतर संपूर्णपणे इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर उमाजी नाईक यांनी आपल्या साथीदारांसोबत पुन्हा एकदा लढा सुरू केला. मात्र ते १८२६ साली पकडले गेले. त्यांच्यावर खटला चालवून त्यांना इंग्रजानी फासावर लटकावले. उमाजी नाईक हे खऱ्याअर्थाने स्वातंत्र्ययुद्धाचे पहिले हुतात्मे आहेत ... !!!

Tuesday 2 February 2010

२ फेब्रुवारी १६८२

२ फेब्रुवारी १६८२ - छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील 'रामशेज' किल्ल्यावर जोरदार हल्ला. मात्र मराठा किल्लेदार 'रंभाजी पवार' यांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला...

Monday 1 February 2010

१ फेब्रुवारी १६८९ - 'छत्रपति संभाजी महाराज' मुघलांच्या तावडीत ... !

१ फेब्रुवारी १६८९ - मराठा सरनौबत म्हालोजी घोरपडे यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुद्धा 'छत्रपति संभाजी महाराज' संगमेश्वर येथे असताना मुघल सरदार शेखनजीब खानाच्या तावडीत सापडले. या लढाईमध्ये म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. ९ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले होते. मराठ्यांच्या छत्रपतिला कैद करून आणले म्हणुन औरंगजेबाने शेखनजीब खानाला 'मुकर्रबखान' हा किताब दिला. अर्थात त्यांना पकडून देण्यात सर्वात मोठा हात होता 'गणोजी शिर्के'या त्यांच्याच म्हेवण्याचा. इंग्रज, पोर्तुगीझ, मुघल अश्या बलाढ्य शत्रूंना पराभूत करणाऱ्या सिंहाच्या छाव्याला अखेर स्वकियांनी धोका दिला.

१ फेब्रुवारी १६८९ हां तो दिवस... ज्यादिवशी शंभूराजे कैद झाले आणि सरनौबत म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. त्या गोष्टीला आज बरोबर ३२१ वर्षे पूर्ण होत आहेत.

घोरपडे खरंतरं पिढीजात आदिलशाहीचे चाकर. पण छत्रपति शिवरायांनी म्हालोजींना आपल्याकडे वळवले. 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेवर असताना गोवळकोंडा येथून त्यांनी म्हालोजी घोरपडे यांना लिहिलेले पत्र 'येथे' वाचू शकता... पुढे १६८५ मध्ये छत्रपति संभाजी महाराज यांच्या काळात सैन्याचे सरनौबत झाले. संताजी-धनाजी मधल्या संताजी घोरपड़े यांचे ते वडिल.

अजून एक योगायोग म्हणजे माझा ब्लॉगमित्र सचिन उर्फ़ साळसूद पाचोळा याने २ दिवसांपुर्वीच त्या प्रसंगावर एक अप्रतिम ब्लॉगपोस्ट लिहिला तो ही आवर्जुन वाचाच.

मराठी दोलत डुबवू पाहणाऱ्या त्या भयाण काळरात्री तो म्हातारा आपल्या दोन बांड्या पोरांसह जीवाच्या आकांतानं दौडत होता... पन्हाळ्यावरून.. संगमेश्वराकडे.... घाट-पांदीतून... गचपानातून...., कारण त्यांच्याही पुढे औरंग्याचा मुकर्रबखान सावज टिपायला उरफोडीनं दौडत होता...    .... पूर्ण वाचा ...

Thursday 28 January 2010

२८ जानेवारी १६४६

२८ जानेवारी १६४६ - शिवाजीराजांचे 'मराठी राज्याची राजमुद्रा' वापरून लिहिलेले पहिले उपलब्ध पत्र.

स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. 'बदअमलाबद्दल कड़क शासन'  (येथे पत्र क्र. २ पहा) ते करत असत. जानेवारी १६४६ मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याला एका स्त्री सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. (चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे, पण त्यानंतर माणूस रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या जात.) आणि त्याचाच कुळातील सोनजी गुजर ह्याला २८ जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार राजांनी पाटिलकी मान्य केली होती.



"प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनो शिवस्यैशा मुद्राभद्राय राजते"

Monday 25 January 2010

२६ जानेवारी १६६२

२६ जानेवारी १६६२ - लोहगड - विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजेच्या चढाया.

१६६१ पासून मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यात येउन बसला होता. स्वराज्यावर सारखे हल्ले करत होता. ह्यात मावळामधल्या लोकांची खुप जीवित व वित्तहानी होत असे. कुठलेच किल्ले हातात येत नाहीत हे पाहून त्याने माणसे  व गावे लुटायला सुरवात केली होती.

परंतु आपल्या प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या शिवरायांनी आपल्या अधिकारयान्ना 'गावचा गाव हिंडून रातीचा दिवस करून तमाम रयेती लोकास घाटाखाली बांका जागा असेल तेथे पाठवणे' असे स्पष्ट बजावले होते.

Saturday 23 January 2010

२३ जानेवारी १६६४

२३ जानेवारी १६६४ - (शालिवाहन शके १५८५, माघ शु.५) शहाजी राजे यांचे कर्नाटकात होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना अपघाती निधन.

१० जानेवारी १६६४ रोजी शिवाजी महाराज सूरतेहून राजगडाकडे निघाले होते. मध्येच लोहगड येथे असताना आपले पिताश्री वारल्याची दुख्खद बातमी त्यांना मिळाली. ते तड़क तसेच आपल्या मातोश्री जिजाऊ माँसाहेब यांना भेटण्यास राजगडाकडे निघाले.

Thursday 21 January 2010

२२ जानेवारी १६६६

२२ जानेवारी १६६६ - आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या कैदेतच १० वर्षानंतर शहाजहानचा मृत्यू. बापाला कैदेत घालून त्याची बादशाही आपल्या ताब्यात घेणे आणि नंतर त्याला मारणे हा मुघली कार्यक्रम औरंगजेबाने सुद्धा यथोचित पार पाडला.

Saturday 16 January 2010

१६ जानेवारी १६६०

१६ जानेवारी १६६० - अफझल खान वधानंतर पन्हाळगड - कोल्हापुर प्रांत हरलेल्या  आदिलशाहीने मराठ्यांवर दुसरी मोहिम उघडली. रुस्तुम झमान आणि फाझल खान शिवरायांवर चालून आले आणि पराभूत होउन पुन्हा विजापुरच्या मार्गाला लागले.

१६ जानेवारी १६६

१६ जानेवारी १६६६ - पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजी महाराजांचा डाव 'नेतोजी पालकर' वेळेवर न आल्याने फसला. १००० मावळे कापले गेले आणि मराठ्यांचा पराभव झाला. नेतोजी पालकरांना शिवरायांनी बडतर्फ केले आणि त्या जागी कुडतोजी गुजरांना 'प्रतापराव' ही पदवी देऊन सरनौबत बनवले.

Friday 15 January 2010

१४ जानेवारी १७६१ - पानिपतचा भयंकर संग्राम ... !

गोष्ट आहे, बुधवार, १४ जानेवारी १७६१ च्या क्रूर दिवसाची. त्या दिवशी तिथी होती पौष शु. अष्टमी. पानिपतचा भयंकर, प्राणघातकी संग्राम याच दिवशी झाला होता. गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,



" कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती,

तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"

घोड्याला घोडी व माणसाला माणसे भिडली. "हर हर महादेव" आणि "अल्ला हो आकबर" चा घोष होऊ लागला. रणमैदान पेटू लागले. गोविंदपंत बुंदेल्यांना ठार मारणारा अन् मराठ्यांची रसद मारणारा अताईखान यशवंतराव पवारांनी फाडून काढला. विजयाची माळ मराठ्यांच्या गळ्यात पडू लागलेली होती. पण दैव फिरले. दुपारी १ वाजता सुर्याचे दक्षिणायन सुरू झाले. मराठी लष्कराची तोंडे देखील दक्षिण बाजूला. आधी महिनाभराचा कडकडीत उपास, त्यात वर तिरप्या सूर्यकिरणांचा मारा. पाण्याची कमतरता. त्यामूळे लढता लढता निव्वळ डोळ्यावर अंधारी येऊन उपाशी जनावरे व माणसे कोसळू लागली.

या युद्धात मराठ्यांची एक सबंध पिढीच्या पिढी कापली गेली. सदाशिवराव भाऊ, विश्वासराव पेशवे, जानकोजी शिंदे, यशवंतराव पवार, तुकाजी शिंदे, संताजी वाघ, इब्राहिमखान गारदी, समशेर बहाद्दर - अवघे मारले गेले. महाराष्ट्रातील प्रत्येक उंबर्‍यातील कमीत कमी एक जण तरी या लढाईत कामी आलेला आहे.

पानिपत येथील पराभव हा मराठी राज्याला कलंक नसून अभिमानास्पद असाच आहे. कारण, या नंतर वायव्य सीमा कायमची सुरक्षित झाली. अफगाणी आक्रमक परत दिल्ली पाहू शकले नाहित...

लिखाण - ॐकार ...

Tuesday 12 January 2010

१२ जानेवारी १५९८

१२ जानेवारी १५९८ - राजमाता जिजाऊ यांची जयंती. वडिल लखुजीराव जाधव आणि आई महालसाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या जिजाउंचे 'राजा शहाजी भोसले' यांच्याशी लग्न झाले.



(फोटो नेटवरुन साभार)

वडिल निजामशाही मध्ये तर नवरा आदिलशाही मध्ये चाकरी करत असताना मात्र मासाहेबांनी स्वतंत्र स्वराज्याची आस धरली होती. (शहाजी राजांच्या साथीने) ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी मराठा साम्राज्याचे 'छत्रपति शिवराय' आणि 'छत्रपति शंभूराजे' असे २ छत्रपति घडवले.

अश्या थोर राष्ट्रमातेस मानाचा त्रिवार मुजरा ... !!!

Sunday 10 January 2010

१० जानेवारी १६६४

१० जानेवारी १६६४ - शिवाजी महाराज सूरतेहून राजगडाकडे निघाले. ४ दिवस सूरत लुटल्यानंतर जमा झालेली अर्धी लुट जमीन मार्गाने राजगडाकडे चालवली तर बाकीची अर्धी सागरी मार्गाने कोकणात. ह्या लुटीमधून उभे राहणार होते दुर्गम असे जलदुर्ग आणि अनेक इतर किल्ल्यांची दुरुस्ती होणार होती.

धन्य ते शिवछत्रपति महाराज... "ज्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले.""

Friday 8 January 2010

८ जानेवारी १६६४

८ जानेवारी १६६४ - पहिल्या सूरत लुटीचा चौथा दिवस. ५ तारखेला सूरत येथे पोचल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला आणि खंडणीची मागणी केली होती.

Wednesday 6 January 2010

६ जानेवारी १६७३

६ जानेवारी १६७३ - शिवाजी महाराजांनी मोहिमेच्या आधीच कोंडाजी फर्जंदांच्या हातात सोन्याचे कडे चढवून त्यांस पन्हाळगडच्या मोहिमेवर पाठवले. त्यांच्या सोबत अनाजी दत्तो होते.

अवघ्या ६० मावळ्यानिशी कोंडाजीने पन्हाळा सर केला. १३ वर्षांपासून अपुर्ण असलेले राजांचे स्वप्न पूर्ण झाले.

६ जानेवारी १६६५

६ जानेवारी १६६५ -शिवरायांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सूर्यग्रहणाच्या निमित्ताने सुवर्णतुला केली. सदर सुवर्णतुला श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर पार पडली.

Tuesday 5 January 2010

५ जानेवारी १६६४ - सुरतेवरील पहिली स्वारी ... !

५ जानेवारी १६६४, मंगळवार -

शिवाजी महाराज सुरतजवळील घणदेवी येथे येऊन धडकले. (सकाळी १० वाजण्याच्या सुमारास) तेथून पूढे ते उधन्यास येऊन पोचले. उधन्यावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला. वकीलाने फर्मावले की, "इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही."

सुरतेमध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली. इनायतखान सुभेदाराने महाराजांची खंडणीची मागणी उडवून लावली. उलट उर्मट जबाब वकीलामार्फत पाठवला. महाराजांनी या वकिलालाच कैद केला.

मराठा फ़ौज सूरतेमध्ये घुसली आणि सूरत बेसुरत केली गेली. इंग्रज, पोर्तुगीझ आपआपल्या वखारीचे रक्षण करण्यासाठी सज्ज होउन बसले होते. तर दुसरीकडे किल्लेदार इनायतखान सूरतेच्या किल्ल्यात दडून बसला होता आणि मुघल फौजेची वाट बघत होता. मराठ्यान्नी पूर्ण ४ दिवस सूरतेमध्ये लुट केली.
.
.

५ जानेवारी १६७१ - साल्हेरची लढाई ... !

५ जानेवारी १६७१ - मराठे आणि मुघल यांच्यात साल्हेर येथील महत्वाची लढाई मराठ्यान्नी फत्ते केली.

नाशिक पूर्व - पश्चिम मधील अनेक किल्ले सर केल्यावर मराठा फौजेने खान्देशातील बुरहारपुर ही मुघल पेठ लूटत 'साल्हेर' या महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्याला वेढा घालून तो जिंकला. त्यावेळी दख्खनेचा मुघल सुभेदार 'दाउदखान' साल्हेर पासून २२ किमी वर होता. किल्लेदार फत्तेहुला खान किल्ला लढवताना मारला गेला.