Thursday 28 January 2010

२८ जानेवारी १६४६

२८ जानेवारी १६४६ - शिवाजीराजांचे 'मराठी राज्याची राजमुद्रा' वापरून लिहिलेले पहिले उपलब्ध पत्र.

स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. 'बदअमलाबद्दल कड़क शासन'  (येथे पत्र क्र. २ पहा) ते करत असत. जानेवारी १६४६ मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याला एका स्त्री सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. (चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे, पण त्यानंतर माणूस रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या जात.) आणि त्याचाच कुळातील सोनजी गुजर ह्याला २८ जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार राजांनी पाटिलकी मान्य केली होती.



"प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनो शिवस्यैशा मुद्राभद्राय राजते"

Monday 25 January 2010

२६ जानेवारी १६६२

२६ जानेवारी १६६२ - लोहगड - विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजेच्या चढाया.

१६६१ पासून मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यात येउन बसला होता. स्वराज्यावर सारखे हल्ले करत होता. ह्यात मावळामधल्या लोकांची खुप जीवित व वित्तहानी होत असे. कुठलेच किल्ले हातात येत नाहीत हे पाहून त्याने माणसे  व गावे लुटायला सुरवात केली होती.

परंतु आपल्या प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या शिवरायांनी आपल्या अधिकारयान्ना 'गावचा गाव हिंडून रातीचा दिवस करून तमाम रयेती लोकास घाटाखाली बांका जागा असेल तेथे पाठवणे' असे स्पष्ट बजावले होते.

Saturday 23 January 2010

२३ जानेवारी १६६४

२३ जानेवारी १६६४ - (शालिवाहन शके १५८५, माघ शु.५) शहाजी राजे यांचे कर्नाटकात होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना अपघाती निधन.

१० जानेवारी १६६४ रोजी शिवाजी महाराज सूरतेहून राजगडाकडे निघाले होते. मध्येच लोहगड येथे असताना आपले पिताश्री वारल्याची दुख्खद बातमी त्यांना मिळाली. ते तड़क तसेच आपल्या मातोश्री जिजाऊ माँसाहेब यांना भेटण्यास राजगडाकडे निघाले.

Thursday 21 January 2010

२२ जानेवारी १६६६

२२ जानेवारी १६६६ - आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या कैदेतच १० वर्षानंतर शहाजहानचा मृत्यू. बापाला कैदेत घालून त्याची बादशाही आपल्या ताब्यात घेणे आणि नंतर त्याला मारणे हा मुघली कार्यक्रम औरंगजेबाने सुद्धा यथोचित पार पाडला.

Saturday 16 January 2010

१६ जानेवारी १६६०

१६ जानेवारी १६६० - अफझल खान वधानंतर पन्हाळगड - कोल्हापुर प्रांत हरलेल्या  आदिलशाहीने मराठ्यांवर दुसरी मोहिम उघडली. रुस्तुम झमान आणि फाझल खान शिवरायांवर चालून आले आणि पराभूत होउन पुन्हा विजापुरच्या मार्गाला लागले.

१६ जानेवारी १६६

१६ जानेवारी १६६६ - पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजी महाराजांचा डाव 'नेतोजी पालकर' वेळेवर न आल्याने फसला. १००० मावळे कापले गेले आणि मराठ्यांचा पराभव झाला. नेतोजी पालकरांना शिवरायांनी बडतर्फ केले आणि त्या जागी कुडतोजी गुजरांना 'प्रतापराव' ही पदवी देऊन सरनौबत बनवले.

Friday 15 January 2010

१४ जानेवारी १७६१ - पानिपतचा भयंकर संग्राम ... !

गोष्ट आहे, बुधवार, १४ जानेवारी १७६१ च्या क्रूर दिवसाची. त्या दिवशी तिथी होती पौष शु. अष्टमी. पानिपतचा भयंकर, प्राणघातकी संग्राम याच दिवशी झाला होता. गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,



" कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती,

तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"

घोड्याला घोडी व माणसाला माणसे भिडली. "हर हर महादेव" आणि "अल्ला हो आकबर" चा घोष होऊ लागला. रणमैदान पेटू लागले. गोविंदपंत बुंदेल्यांना ठार मारणारा अन् मराठ्यांची रसद मारणारा अताईखान यशवंतराव पवारांनी फाडून काढला. विजयाची माळ मराठ्यांच्या गळ्यात पडू लागलेली होती. पण दैव फिरले. दुपारी १ वाजता सुर्याचे दक्षिणायन सुरू झाले. मराठी लष्कराची तोंडे देखील दक्षिण बाजूला. आधी महिनाभराचा कडकडीत उपास, त्यात वर तिरप्या सूर्यकिरणांचा मारा. पाण्याची कमतरता. त्यामूळे लढता लढता निव्वळ डोळ्यावर अंधारी येऊन उपाशी जनावरे व माणसे कोसळू लागली.

या युद्धात मराठ्यांची एक सबंध पिढीच्या पिढी कापली गेली. सदाशिवराव भाऊ, विश्वासराव पेशवे, जानकोजी शिंदे, यशवंतराव पवार, तुकाजी शिंदे, संताजी वाघ, इब्राहिमखान गारदी, समशेर बहाद्दर - अवघे मारले गेले. महाराष्ट्रातील प्रत्येक उंबर्‍यातील कमीत कमी एक जण तरी या लढाईत कामी आलेला आहे.

पानिपत येथील पराभव हा मराठी राज्याला कलंक नसून अभिमानास्पद असाच आहे. कारण, या नंतर वायव्य सीमा कायमची सुरक्षित झाली. अफगाणी आक्रमक परत दिल्ली पाहू शकले नाहित...

लिखाण - ॐकार ...

Tuesday 12 January 2010

१२ जानेवारी १५९८

१२ जानेवारी १५९८ - राजमाता जिजाऊ यांची जयंती. वडिल लखुजीराव जाधव आणि आई महालसाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या जिजाउंचे 'राजा शहाजी भोसले' यांच्याशी लग्न झाले.



(फोटो नेटवरुन साभार)

वडिल निजामशाही मध्ये तर नवरा आदिलशाही मध्ये चाकरी करत असताना मात्र मासाहेबांनी स्वतंत्र स्वराज्याची आस धरली होती. (शहाजी राजांच्या साथीने) ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी मराठा साम्राज्याचे 'छत्रपति शिवराय' आणि 'छत्रपति शंभूराजे' असे २ छत्रपति घडवले.

अश्या थोर राष्ट्रमातेस मानाचा त्रिवार मुजरा ... !!!

Sunday 10 January 2010

१० जानेवारी १६६४

१० जानेवारी १६६४ - शिवाजी महाराज सूरतेहून राजगडाकडे निघाले. ४ दिवस सूरत लुटल्यानंतर जमा झालेली अर्धी लुट जमीन मार्गाने राजगडाकडे चालवली तर बाकीची अर्धी सागरी मार्गाने कोकणात. ह्या लुटीमधून उभे राहणार होते दुर्गम असे जलदुर्ग आणि अनेक इतर किल्ल्यांची दुरुस्ती होणार होती.

धन्य ते शिवछत्रपति महाराज... "ज्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले.""

Friday 8 January 2010

८ जानेवारी १६६४

८ जानेवारी १६६४ - पहिल्या सूरत लुटीचा चौथा दिवस. ५ तारखेला सूरत येथे पोचल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला आणि खंडणीची मागणी केली होती.

Wednesday 6 January 2010

६ जानेवारी १६७३

६ जानेवारी १६७३ - शिवाजी महाराजांनी मोहिमेच्या आधीच कोंडाजी फर्जंदांच्या हातात सोन्याचे कडे चढवून त्यांस पन्हाळगडच्या मोहिमेवर पाठवले. त्यांच्या सोबत अनाजी दत्तो होते.

अवघ्या ६० मावळ्यानिशी कोंडाजीने पन्हाळा सर केला. १३ वर्षांपासून अपुर्ण असलेले राजांचे स्वप्न पूर्ण झाले.

६ जानेवारी १६६५

६ जानेवारी १६६५ -शिवरायांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सूर्यग्रहणाच्या निमित्ताने सुवर्णतुला केली. सदर सुवर्णतुला श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर पार पडली.

Tuesday 5 January 2010

५ जानेवारी १६६४ - सुरतेवरील पहिली स्वारी ... !

५ जानेवारी १६६४, मंगळवार -

शिवाजी महाराज सुरतजवळील घणदेवी येथे येऊन धडकले. (सकाळी १० वाजण्याच्या सुमारास) तेथून पूढे ते उधन्यास येऊन पोचले. उधन्यावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला. वकीलाने फर्मावले की, "इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही."

सुरतेमध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली. इनायतखान सुभेदाराने महाराजांची खंडणीची मागणी उडवून लावली. उलट उर्मट जबाब वकीलामार्फत पाठवला. महाराजांनी या वकिलालाच कैद केला.

मराठा फ़ौज सूरतेमध्ये घुसली आणि सूरत बेसुरत केली गेली. इंग्रज, पोर्तुगीझ आपआपल्या वखारीचे रक्षण करण्यासाठी सज्ज होउन बसले होते. तर दुसरीकडे किल्लेदार इनायतखान सूरतेच्या किल्ल्यात दडून बसला होता आणि मुघल फौजेची वाट बघत होता. मराठ्यान्नी पूर्ण ४ दिवस सूरतेमध्ये लुट केली.
.
.

५ जानेवारी १६७१ - साल्हेरची लढाई ... !

५ जानेवारी १६७१ - मराठे आणि मुघल यांच्यात साल्हेर येथील महत्वाची लढाई मराठ्यान्नी फत्ते केली.

नाशिक पूर्व - पश्चिम मधील अनेक किल्ले सर केल्यावर मराठा फौजेने खान्देशातील बुरहारपुर ही मुघल पेठ लूटत 'साल्हेर' या महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्याला वेढा घालून तो जिंकला. त्यावेळी दख्खनेचा मुघल सुभेदार 'दाउदखान' साल्हेर पासून २२ किमी वर होता. किल्लेदार फत्तेहुला खान किल्ला लढवताना मारला गेला.