Monday 16 August 2010

१७ ऑगस्ट १६६६... आग्र्याहून सुटका... एक थरारक पलायन...


१६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले. आजही तुम्ही कधी पुरंदरला गेलात तर मुरारबाजींचा पुतळा बघून त्यांच्या शौर्याची गाथा कळते. किल्लेदाराबरोबर किल्लाही पडला.

तह व्हायच्या आधी शिवाजीराजांनी मिर्झाराजाला एक पत्र पाठवले होते. या पत्रामधून तत्कालीन परिस्थितीचे आणि शिवरायांच्या मन:स्थितीचे यथार्थ चित्रण झाले आहे. हे पूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."
सर्वत्र सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन राजांनी मुघलांशी तह करायचे ठरवले. पुरंदरचा तह घडला. १६ वर्षात जे कमावले ते सर्व या तहात राजांनी गमावले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. तहानंतर शिवाजीराजे कुतुबशहा आणि आदिलशहाच्यासाथीने मुघलांविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करतील अशी भिती मिर्झाराजाला होती म्हणून त्याने बादशहाला कळवले की 'कुठल्याही परिस्थितीत शिवाजीला आपल्याकडे वळवून घ्यायला हवे. त्यासाठी मी शिवाजीला आपल्या दरबारी पाठवत आहे.' मिर्झाराजाने राजांना आग्रा येथे जाण्यास तयार केले आणि त्याप्रमाणे ५ मार्च १६६६ रोजी राजे आग्रा येथे जाण्यास निघाले. स्वतःच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त खुद्द औरंगजेबाने त्यांना पत्र पाठवून आमंत्रित केले होते. 'मनात कुठलीही चिंता किंवा शंका न ठेवता मला भेटायला या. आपला येथे सत्कार केला जाईल आणि तुम्हाला पुन्हा दख्खनेत जाण्याची मुभा असेल.' मजल-दरमजल करत शिवाजीराजे १२ मे रोजी तेथे पोचले.


................. आणि 'दिवाण-ए-खास' मध्ये जे घडले तो इतिहास आहे. जोगळेकर त्यांच्या सह्याद्री ग्रंथात म्हणतात,
''आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला. धन्य त्यांची की हे वैभव पाहून स्वदेशी परत आल्यावर त्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले."

त्या दिवशी नेमके काय घडले हे अधिक जाणून घेण्यासाठी येथे जा ... Threat to Life ...

परिणाम ठरलेला होता. राजे नजरकैदेत टाकले गेले. अर्थ स्पष्ट होता. मृत्यू.... कधी? केंव्हा? कसा? काहीच ठावूक नव्हते. दख्खनेतून जयसिंगने 'शिवाजीस मारू नये. तसे केल्यास इकडे परिस्थिती हाताबाहेर जाईल पण इकडे सुद्धा येऊ देऊ नये' असे पत्र औरंगजेबाला पाठवले. औरंगजेबाने राजांना काबुल मोहिमेवर पाठवायचे ठरवले. अर्थात राजांनी बादशहाची कुठलीच गोष्ट मानायला साफ नकार दिला. परिस्थिती अधिक बिकट होत होती. कुठल्याही क्षणी आपला मृत्यू समोर येईल हे राजांना ठावूक होते. अखेर एक योजना आखली गेली. थरारनाट्य ठरले. राजांबद्दल आग्र्याच्या बाजारात अफवा पसरत होत्या. खुद्द जसवंतसिंग औरंगजेबाला सांगत होता. 'शिवाजीकडे दैवी शक्ती आहे. तो १४-१५ हात लांब उडी मारू शकतो. एका फटक्यात ४०-५० कोस अंतर तो चालून जातो.' दुसऱ्या दिवसापासून बादशाहने स्वतःभोवतीची सुरक्षा अधिक वाढवली. राजांबरोबर असलेले संभाजीराजे मात्र नजर कैदेत नव्हते. त्यांना फिरायला मुभा होती. त्यांच्या सोबत सर्जेराव जेधे आग्र्याबद्दल इत्यंभूत माहिती काढत. योजना हळूहळू पुढे सरकत होती. ७ जून रोजी राजांनी सोबत असलेल्या सर्व सेवक आणि सैन्याला परत दख्खनेत पाठवून दिले. सोबत होते फक्त संभाजीराजे, हिरोजी फर्जंद, सर्जेराव, रघुनाथ बल्लाळ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर आणि मदारी मेहतर.



१७ ऑगस्ट १६६६. दिवसा-ढवळ्या, १००० सैनिक खडा पहारा देत असताना राजे नजरकैदेतून पसार झाले. ते नेमके कसे निसटले ह्याबाबाबत कुठलाच ठोस पुरावा उपलब्ध नाही. 'मिठाईचा पेटारा'ची कथा जी काल्पनिक आहे ती मुघली कागदपत्रांमधून घेतलेली आहे. औरंगजेबाने शोध मोहीम काढली. पण आता खूप उशीर झाला होता. एक थरारक पलायन यशस्वी झाले होते. राजांनी मुघलांची शेवटची चौकी २० ऑगस्ट रोजी चक्क खोटे दस्तक दाखवून पार केली. चौकीदार होता लातिफखान. औरंगजेबाला जेंव्हा हे कळले तेंव्हा त्याने 'लातिफखान बेवकूफ है' असे उद्गार काढल्याची नोंद मुघल कागदपत्रांमध्ये आहे. आता संभाजीराजांना मथुरेला विश्वासरावांकडे ठेवून शिवाजीराजे वेगाने पुढच्या मार्गाला निघाले. आपल्या ९ वर्षाच्या मुलाला मागे ठेवून जाताना त्यांना काय वाटले असेल...!!! पण एकत्र जाणे धोक्याचे होते तेंव्हा त्यांना काळजावर दगड ठेवून तो निर्णय घ्यावा लागला असणार. तिकडे आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार फुलौतखानाला सापडले. शिवाजीराजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजीराजे मथुरेतून खासच पकडले गेले असते, व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते. राजांनी थेट दख्खनेचा रस्ता न धरता मुघलांच्या आवाक्याबाहेरचा मार्ग घेतला होता. मथुरेवरून अलाहाबाद - बनारस - गया - गोंडवन आणि तिथून गोअळकोंडा. वाटेत ठिकठिकाणी शत्रूशी त्यांची गाठ पडली. त्यांनी संन्याश्याचा वेश धारण केला. जास्तीतजास्त प्रवास पायी केला. अथक परिश्रम करून राजे दख्खनेत पोचले. पण अजून संभाजीराजे मथुरेमध्येच होते. शिवाजीराजे राजगडी पोचल्याची बातमी आग्र्याला पोचली तेंव्हा मुघलांची शोध मोहीम थांबली. रस्ता अधिक सुरक्षित झाल्यावर विश्वासराव संभाजीराजांना घेऊन खुद्द राजगडी पोचले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती.


हताश झालेला औरंगजेब आता फारसे काही करू शकत नव्हता. आता काय कधीच काही करू शकत नव्हता. त्याच्या मनात एकच सल होता. 'एक क्षणाच्या निष्काळजीपणाचं पर्यावसान शिवाजीच्या पलायनात झाल्यामुळे खूप मोठी किंमत चुकवावी लागली आहे. मराठ्यांबरोबरच्या युद्धाला आता कधीही अंत नाही हे तो उमगला होता.'

३१ वर्षानंतर '२१ फेब्रुवारी १७०७' रोजी नगर येथे म्हातारा बादशहा हाच सल घेऊन 'अल्लाला प्यारा' झाला. दख्खन तो कधीच जिंकू शकला नाही...

16 comments:

  1. प्रचंड भारी लिहिलंयस रोहना... रोमांच उभे राहिले अंगावर!

    ReplyDelete
  2. I am extremely proud after reading this.. Gr8 work Rohan!!!- Ruta

    ReplyDelete
  3. atishay sundar !2 velaa vachala.parat aalo ki vachenach.

    ReplyDelete
  4. अप्रतिम.. सगळं माहित असूनही पुन्हा वाचताना अंगावर रोमांच उभं राहिला. धन्य ते शिवराय !!!

    ReplyDelete
  5. सुंदर रोहन. इनामदारांची इतिहासावरील पुस्तके मी वाचत असे लहानपणी....त्याची आठवण झाली. धन्यवाद.

    ReplyDelete
  6. वाह पूर्ण इतिहास परत डोळ्यासमोर उभा केलास बघ तू...
    धन्य ते शिवराय...

    ReplyDelete
  7. अप्रतिम ..
    वाचताना शहारून येते ..

    ReplyDelete
  8. 'मिठाईचा पेटारा'ची कथा काल्पनिक आहे? मला माहित नव्हतं..
    खूप छान माहिती दिली आहे.
    जिओ..

    ReplyDelete
  9. अरे सुंदर लिहिलं आहेस खुप !! अप्रतिम !!

    ReplyDelete
  10. बरोबर आहे हेरंब तुझं... सगळा ईतिहास माहित असुनही हा लेख वाचताना पुन्हा काटा येतोय अंगावर!!!

    रोहणा जियो!!

    ReplyDelete
  11. भन्नाट संकल्पना ! अधाशासारखे वाचताना पण दम लागतोय.
    सवडीने वाचून तुला भेटतो

    ReplyDelete
  12. U have a knack to write.
    EXCELLENT!!
    DWRaut

    ReplyDelete
  13. सर्वांचे मनापासून आभार ... पुढचे लिखाण करीन लवकरच... :)

    ReplyDelete
  14. छत्रपतींचा करिष्मा होताच असा ! पण हे पलायन पेटाऱ्या थ्रु होता कि वेषांतर याबद्दल confus आहे रे

    ReplyDelete