Thursday 30 July 2009

३१ जुलै १६५७

३१ जुलै १६५७ - मुघलांनी विजापुरचा 'कल्याणी' किल्ला जिंकून घेतला.

Saturday 25 July 2009

२५ जुलै १६४८

२५ जुलै १६४८ - विजापूर बादशाहाच्या आज्ञेने मुस्तफाखानाने 'जिंजी'नजीक शहाजी राजांना कैद केले.

पुढे १६ मे १६४९ रोजी विजापुरच्या आदिलशहाकडून शहाजीराजांची सुटका झाली.
शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि मुघलांचा दख्खनेचा सुभेदार शहजादा मुराद यास १४ मार्च १६४९ रोजी पत्र लिहिले होते. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर १६ मे १६४९ रोजी शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.

****************************************************************************************

२५ जुलै १६६६ - औरंगजेबाने शिवरायांसोबत आग्रा येथे आलेल्या मराठा फौजेचे परतीचे परवाने शिवरायांकड़े सुपूर्त केले.


दि. ७ जून १६६६ रोजी शिवाजी राजांनी औरंगजेबाकडे मागितलेले परवाने, अखेर आजच्या दिवशी औरंगजेबाने ते परवाने महाराजांना दिले. या परवान्यानूसार शिवाजी राजांना आपल्याबरोबर आलेल्या फौजेला आग्र्याहून रजा देऊन महाराष्ट्रात पाठवता येणार होते.

Thursday 23 July 2009

२३ जुलै १८५६

२३ जुलै १८५६ - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १५३ वी जयंती.

Wednesday 22 July 2009

२२ जुलै १६७८

२२ जुलै १६७८ - तामीलनाडू मधील वेलोरचा किल्ला रघुनाथपंत व आनंदराव मकाजी यांनी जिंकला.

जिंजी येथील राजकारण यशस्वी करून आणि जिंजी ताब्यात घेउन छत्रपति शिवाजी महाराज वेल्लोर किल्ला जिंकायला स्वतः जातीने दाखील झाले होते. किल्ल्याला वेढा घालून सुद्धा किल्ला सहजा-सहजी हातात येणार नाही आणि ह्यात वेळ बराच जाणार आहे असे समजल्यावर त्यांनी रघुनाथपंत व आनंदराव मकाजी यांच्यावर ही कामगिरी सोपवली. पूर्ण किल्ल्याला चारही बाजूने खोल खंदक असून सुद्धा हा किल्ला मराठ्यान्नी जिंकला.

Monday 20 July 2009

२० जुलै १७६१

२० जुलै १७६१ - माधवराव यांनी पेशवेपदाची सूत्रे हाती घेतली.

पानीपतच्या युध्हानंतर नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू झाला. रघुनाथराव यांनी पेशवेपदावर दावा सांगितला पण माधवराव यांनाच पेशवेपद मिळाले.

खचलेल्या मराठा साम्राज्याला नवी उभारी देण्यास वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पेशवे माधवराव सज्ज झाले होते.

Wednesday 15 July 2009

१५ जुलै १६७४

१५ जुलै १६७४ - मुघल सरदार बहादूरखान कोकलताश याच्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. सुमारे १ कोटीची लूट रायगडावर जमा झाली.

१६७४ मध्ये राजाभिषेकानंतर पुन्हा एकदा मराठ्यान्नी मुघल भागात छापे मारून लुट मिळवणे सुरु केले. पेडगावमध्ये मोठ्या प्रमाणात मुघल फौज होती मात्र मराठ्यान्नी त्यांना मुर्ख बनवून लुट मिळवली. काही हजारांचे सैन्य आधी पेड़गाववर चालून गेले आणि जेंव्हा मुघल फौज समोर उभी ठाकली तेंव्हा मात्र मागे फिरून पळू लागले. मुघल फौजेला वाटले मराठे घाबरुन मागे पळत आहेत. मात्र डाव वेगळाच होता. ज्याक्षणी मुघल फौज मराठा सैन्याचा पाठलाग करत-करत पेड्गावच्या हद्दीपासून दूर गेली त्याक्षणी दुरवर लपून बसलेल्या इतर मराठा फौजेने पेड़गावमध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण पेड़गाव लुटले. अर्थात मुघल फौजेला जेंव्हा जे समजले त्यावेळी ते मागे फिरले मात्र मराठा सैन्याने तोपर्यंत आपले काम चोख केले होते. ह्यालुटीने राजाभिषेकाचा बराचसा खर्च शिवरायांनी भरून काढला.

Sunday 12 July 2009

१२ जुलै १९०८

१२ जुलै १९०८ - लोकमान्य टिळकांना मंडालेची सहा वर्षांची शिक्षा झाली, या घटनेला १२ जुलै रोजी १०० वर्षे पूर्ण.

यावेळी मुंबईच्या जनतेने सहा दिवस प्रक्षुब्ध होऊन हरताळ पाळला. मुंबई हायकोर्टात दोन आठवडे चाललेल्या लोकमान्य टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्याचा निकाल त्यादिवशी रात्री दहा वाजता न्या. दावरनी देऊन लोकमान्यांना सहा वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंडाची जबर शिक्षा ठोठावली.

Friday 10 July 2009

११ जुलै १६५९

११ जुलै १६५९ - शिवाजी राजे अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी राजगड वरुन निघून प्रतापगड येथे पोचले.
स्वराज्याच्या भूमीवरती (१२ मावळ प्रांतात) युद्ध होऊ नये म्हणुन स्वराज्याच्या सरहद्दीवरती जाउन लढायची शिवरायांची रणनीती होती. शिवाय अफझलखानाच्या अवजड फौजेशी लढाईसाठी जावळी ही अतिशय योग्य रणभूमी आहे हे राजांना खुप आधी पासून पक्के ठावुक होते. त्यासाठीच तर त्यांनी २ वर्षात भोरप्याच्या डोंगरामधून प्रतापगड बांधून काढला होता.
उन्मत्त हत्तीला जंगलात खेचून आणून मारायचा डाव लवकरचं फत्ते केला जाणार होता...

Wednesday 8 July 2009

८ जुलै १९१०

८ जुलै १९१० - स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेल्सच्या (फ्रांस) समुद्रात उडी घेतली.

संदर्भ ... डॉ. सच्चिदानन्द शेवडे .. लोकसत्ता विशेष ... !!!

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली, त्या घटनेस ८ जुलै २००९ रोजी ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. समस्त भारतीयांना अभियान वाटावा असे इतिहासातील हे सोनेरी पान.

१ जुलै १९१० ला त्यांना ‘मोरिया’ बोटीवर चढविण्यात आले. ती ७ जुलैला मार्सेल्सला आली. शौचकुपातल्या पोर्टहोलचे माप त्यांनी जानव्याने घेतले. खिडकीचा व्यास १२ इंच होता. सावरकरांच्या छातीचा घेर ३२ इंच होता. सर्व पाहाणी करून झाल्यावर ८ जुलैच्या सकाळी त्यांनी शौचाला जाण्याचा बहाणा केला. आत जाताच अंगातला गाऊन काढून काचेच्या दारावर पसरून अडकवला. एका झेपेत कमोडवरील पोर्टहोल गाठले. कसेबसे शरीर त्यातून बाहेर काढले. त्याचवेळी संडासाचे दार फोडून शिपाई आत घुसले. सोलवटल्या शरीराने सागरात उडी घेतली. गँगवेवर उभ्या असलेल्या क्वार्टर मास्टरने हे दृष्य पाहून आरडाओरडा केला. अटकेतून सुटका करून घेण्यासाठी अपरिचित समुद्रात उडी घेणे हे लोकविलक्षण साहस होते. समोरचा धक्का हा नऊ फूट उंच होता. त्यावरील शेवाळामुळे ते एक दोनदा पाण्यात पडले. तरीही नेटाने तो धक्का चढून गेले. तेथे कोणी सहकारी दिसत नाहीत हे पाहून ते धावू लागले. काही अंतरावर एक फ्रेंच पोलीस त्यांना दिसला. त्याला ते म्हणाले, Take me into your Custody. Assist me. Take me before a magistrate! त्याला इंग्रजी येत नव्हते नि त्यांना फ्रेंच येत नव्हते. तोवर तेथे येऊन पोचलेल्या शिपायांनी त्या पोलिसाची मूठ गरम केली आणि सावरकरांना ताब्यात घेतले.


हे प्रकरण दाबायचा प्रयत्न इंग्रजांनी केला, पण कामाबाईंमुळे ‘ल ताँ’ या फ्रेंच वृत्तपत्रात ९ जुलै आणि डेली मेलच्या ११ जुलैच्या अंकात हे वृत्त प्रसिद्ध झाले. आता सावरकरांसाठी ‘इनर केबिन’ निवडण्यात आली. चोवीस तास लक्ष ठेवण्यात येऊ लागले. डेकवर हिंडताना दोन रक्षक त्यांचे हात पकडून फिरत असत. केबिनमधील दिवे चालू असत. त्यांच्या तोंडावर प्रकाश पडेल अशी योजना करण्यात आली. त्यामुळे स्वस्थ झोप घेणे दुरापास्त झाले. या स्थितीतही त्यांना काव्य सुचले..

अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला।
जिंकिल रिपु कवण असा जगति जन्मला।।


यानंतर मोरिया बोट एडनला आली. तिथे सशस्त्र शिपायांच्या गराडय़ात सावरकरांना उतरविण्यात आले व सालसेट नामक बाष्पनौकेवर चढविण्यात आले. २२ जुलैला ही नौका कडेकोट बंदोबस्तात मुंबईला पोचली. आचार्य अत्रे त्यावेळचे वर्णन करताना म्हणतात, ‘ज्यावेळी आमचा हा पुरुषसिंह इंग्रज सरकारने तुरुंगात नेऊन कोंबला, तेव्हा त्याचा आवेश आणि डरकाळ्या ऐकून मी मी म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांच्या छातीत धडकी भरत असे.’ वृत्तपत्रातल्या बातम्यांमुळे फ्रान्स सरकारवर दडपण आले. सरकारने आंतरराष्ट्रीय निर्बंधांनुसार हक्काचा प्रश्न काढला. यावर उत्तर देण्यासाठी इंग्रज राजधुरिणांची तारांबळ उडाली. डेली मेलसारख्या ब्रिटिश वृत्तपत्रांनी देखील सरकारला धारेवर धरले. बॅ. बॅप्टिस्टा हे सावरकरांचे वकील होते. त्यांनी सावरकरांबरोबर चर्चा करून मार्सेल्सचा वृत्तान्त नीट लिहून काढला व पॅरिसमधील मित्रांकडे धाडला. ल ह्यूमनाईट व ल ताँ या वृत्तपत्रांनी या आधारे लेख लिहिले. डेली न्यूजने लंडनमधे तेच केले. या सर्वांना उत्तर देणे इंग्रज सरकारला कठीण झाले.


अखेर हेग येथील आंतरराष्ट्रीय निवाडा न्यायमंडळापुढे हे प्रकरण जावे, असे फ्रेंच सरकारने सुचवले. ब्रिटनने ते मान्य केले, पण त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत अभियोग स्थगित ठेवण्याची मागणी मात्र फेटाळली. सावरकरांना फ्रेंच सरकारच्या स्वाधीन करायला हवे की नको, एवढय़ासाठीच हा सर्व घोळ घालण्यात आला. हा निवाडा होण्यापूर्वी ३० जानेवारी १९११ ला सावरकरांना दोन जन्मठेपांची शिक्षा झाली.
हेग येथील सुनावणी 'In Camera' झाली व त्यांनी इंग्लंडची बाजू योग्य ठरवली. यामुळे टीकेचे मोहोळ उठले व फ्रेंच पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. एकूण या एका कृतीमुळे सावरकरांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले एवढे खरे!

Tuesday 7 July 2009

आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमा ...


दिवस होता गुरूपौर्णिमेचा ... १२ जुलै १६६० ... पावनखिंड - बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली. जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओशाळवले.

आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या दिवशी शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. पौर्णिमेची रात्र. चंद्रप्रकाश असूनसुद्धा पावसाळी ढगांमुळे फारसे काही दिसत नव्हते. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला त्याचा पत्ता लागला. पालखी पकडली गेली.



'शिवाजी आपल्या ताब्यात आला आहे' अश्या खुशीत असलेल्या जोहरच्या भ्रमाचा भोपळा लगेच फुटला. त्याला कळून चुकले की हे राजे नसून शिवा काशिद नावाचा दुसराच कोणी तरी आहे. राजे आपल्या हातून निसटले आहेत. त्याने सिद्दी मसूद आणि फाझल खानाला शिवरायांच्या मागावर पाठवले. पाठलाग सुरु झाला ... शिवाजी राजे पालखीचा गोंडा पकडून बसले होते. बाजींचा आवाज त्यांच्या कानावर येत होता. 'चला गनीम पाठीवर आहे.' दर काही मिनिटांना पालखीचे भोई बदलत, वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत ते ६०० वीर विजेच्या वेगाने पळत सुटले होते. उदिष्ट एकच होत - विशाळगड़. हातात नंग्या तलवारी घेउन बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते. मागचे आणि पुढचे हेर बित्तंबातमी राजांकड़े पोचवत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती. क्षण अन क्षण आता महत्त्वाचा होता.



सिद्दीमसूदचे सैन्य घोड्यावरुन राजांचा पाठलाग करत होते. त्यांनी थोडा वेगळा मार्ग घेतला होता. अर्थात घोड़खिंडीच्या अलिकड़े राजांना गाठायचे असे त्यांनी पक्के केले असेल. त्यांच्या थोड़े मागून आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ येत होते. राजांचे पहिले लक्ष्य होते पांढरपाणी. एकदा तिकडे पोचले की खिंड गाठणे अवघड जाणार नव्हते. आदल्या दिवशी रात्री १० वाजता पन्हाळगड सोडल्या पासून १२ तासात कोणी थोडया विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते. एका ध्येयाने भारावल्यागत ते ६०० वीर विशाळगडाकड़े पळत सुटले होते.



पन्हाळगड ते पावनखिंड एकुण अंतर आहे ६१ किलोमीटर. तर पन्हाळगड पासून ५५ किलोमीटर अंतरावर आणि पावनखिंडिच्या ६ किलोमीटर अलिकड़े पांढरपाणी आहे. पांढरपाणीच ऐतिहासिक महत्व अनन्य साधारण आहे. महाराज पांढरपाणीला येउन पोचलो होते त्यावेळेला घोड्यावरुन राजांचा पाठलाग करणारे सिद्दीमसूदचे सैन्य अगदी जवळ येउन ठेपले होते. धोका वाढत जात होता. कुठल्याही क्षणी त्यांची धाड पडेल असे वाटू लागले. शत्रुला गुंतवायला राजांनी २५ मावळे पांढरपाणीला ठेवले आणि ते घोड़खिंडीकड़े निघाले. अवघे २५ जण आता त्या २००० घोडेस्वारांशी लढायला तयार झाले होते. जास्तीत जास्त वेळ शत्रुला रोखून धरायचे काम त्यांना बजावावे लागणार होते. तितका बहुमूल्य वेळ राजांना खिंडीकड़े सरकायला मिळणार होता. आलेल्या घोडदळाला त्या २५ मावळ्यांनी शर्थीने रोखून धरले. त्यात त्या सगळ्या २५ जणांना मृत्यू आला. पण आपले काम त्यांनी चोख बजावले होते. पांढरपाण्याची नदी रक्ताने लाल झाली होती. राजे घोडखिंडीकड़े जाउन पोचले होते.

"पावनखिंड - बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली. जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओशाळवले. "

राजांनी रायाजी बांदलाला ३०० मावळे सोबत घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोखायचे काम दिले. पण आपल्या मालकाऐवजी म्हणजेच रायाजीऐवजी मी ह्या ठिकाणी थांबतो, तुम्ही रायाजीला सोबत घेऊन विशाळगड गाठा, असे बाजींनी राजांना सुचवले. बाजींची स्वामीभक्ती येथे दिसून येते. आता राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशाळगडाकड़े निघाले. बाजींनी खिंडीमध्ये आपली व्युव्हरचना केली. चढणीवरच्या आणि आसपासच्या झाडीमध्ये गटागटाने मावळे तैनात केले. प्रत्येकाकडे गोफणीतून भिरकवायचे दगड आणि ढकलायचे शिलाखंड जमा केले गेले. शत्रु टप्यात येण्याची वाट बघत सगळे दडून बसले होते. १२-१३ तासांच्या अथक वाटचाली नंतर सुद्धा निवांतपणा नव्हता. निर्णायक लढाईसाठी आता ते ३०० वीर सज्ज झाले होते. पूर्वेच्या दिशेने घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येऊ लागले. थोड्यावेळात शत्रु नजरेत येऊ लागला पण शत्रुच्या नजरेत लपलेले मावळे काही येत नव्हते. त्या अवघड निसरड्या वाटेने एक रांग धरून सिद्दीमसूदचे घोडेस्वार उतरु लागले. गोफणीच्या टप्यात शत्रू आल्यावर बाजींनी एकच हाकाटी दिली आणि अचानक शत्रूच्या अंगावर दगड बरसू लागले. घोड्यांनी कच खाल्ली. काही उधळले. काही सरकून पडले. एकच गोंधळ उडाला. कित्येकांची डोकी फुटली, बाकी जिवाच्या भीतीने मागे पळाले. मावळ्यांनी हर हर महादेवचा नारा दिला. पण शत्रू इतक्यात मागे सरकणार नव्हता. घोडेस्वार पुन्हा उतरु लागले. मावळ्यांनी पुन्हा दगड भिरकवायला सुरवात केली. ते शत्रूला काही केल्या पुढे सरकू देईनात. साधारण ४ वाजत आले होते. थोड़े मागून येणाऱ्या आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ आता खिंडीकड़े येउन पोचले. ते अधिक वेगाने ओढ़यापलिकडे सरकू लागले. आता मावळ्यांनी त्यांच्यावर शिलाखंड ढकलायला सुरवात केली. त्यामुळे पायदळाची पांगापांग होऊ लागली. अखेर तासाभरानी शत्रूला वर पोहोचण्यात यश मिळाले.

आता आजूबाजुच्या झाडीमधून बाजीप्रभू आणि इतर मावळे बाहेर पडले आणि प्रत्यक्ष रणमैदानात शस्त्राची लढाई सुरु झाली. एक-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजींच्या तलवारीच्या टप्यात येणारा प्रत्येकजण यमसदनी जात होता. स्वतःच्या देहाची जणू काही त्यांनी तटबंदी करून घेतली होती. बाजींचे थोरले बंधू फुलाजीप्रभू सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते. इतक्यात शत्रूने फुलाजीप्रभुंवर डाव साधला. ते खाली कोसळले. त्यांच्या हातून खड्ग गळाले. बाजींनी एक नजर त्यांच्याकड़े पाहिले. ते म्हणाले, "दादा, तुम्ही थोरले. पहिला मान तुम्ही घेतला." फुलाजीप्रभुंची तलवार त्यांनी उचलली. आधी एक ढाल - एक तलवार घेउन लढणाऱ्या बाजींनी आता दोन्ही हातात तलवारी घेतल्या होत्या. त्यांचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दणाणले होते. बाजी आता अधिक त्वेषाने लढत होते. त्यांच्या देहाची आता चाळण उडाली होती. रक्ताचे अर्ह्य ओसंडत होते. हे काही आपली वाट सोडत नाहीत असे पाहून पिडनायकाने आपल्या एका पायदळ सैनिकाला ठासणीच्या बंदूकीतून बाजींवर गोळी झाडायला सांगितली. ती गोळी बाजींच्या खांद्यात घुसली. बाजींचा शस्त्राचा एक हात थांबला. लढता-लढता ते खाली कोसळले. पण त्यांचे प्राण काही जात नव्हते. त्यांचे कान विशाळगडाकड़े लागले होते. राजे जोपर्यंत गडावर पोचून तोफांचे बार देत नाहीत तोपर्यंत त्यांनी मृत्युला ठणकावून सांगितले " तोफे आधी न मरे बाजी. " बाजींच्या मनाची घालमेल होत होती. त्यांच्या मनात अखेरचे विचार सुरु होते.

सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... ! धृ


दिसू लागले अभ्र सभोवती ... विदिर्ण झाली जरीही छाती ... !
अजून जळते आंतरज्योती ... अजून जळते आंतरज्योती ... कसा सावरू देह परी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! १
होय तनूची केवळ चाळण ... प्राण उडाया बघती त्यातून ... !
मिटण्या झाले अधीर लोचन ... मिटण्या झाले अधीर लोचन ... खड्ग गळाले भूमिवरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... !



पावनखिंडित पाउल रोवून ... शरीर पिंजे तो केले रण ... !
शरणागतीचा अखेर येई क्षण ... शरणागतीचा अखेर येई क्षण ... बोलवशील का आता घरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! ३

तिकडे विशाळगडाच्या वाटेवर राजांच्या मनाची घालमेल होत होती. रणगर्जनेचे आवाज त्यांच्या कानावर पडले होते. पण त्यांना पुढे सरकणे भाग होते. विशाळगडाला वेढा घालून बसलेल्या सुर्वे आणि दळवी या आदिलशहाच्या वतनदारांच्या सैन्याला कापत सतत २१ तासांच्या वाटचालीनंतर राजांनी विशाळगड गाठला आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांचे बार देण्याची आज्ञा केली. ते बार घोड़खिंडीमध्ये ऐकू गेले. त्यानंतरच समाधानाने बाजींनी आपला देह सोडला.


"इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो."
पावनखिंडितला हा अनुभव असाच एक अविस्मरणीय असा आयुष्यावर कायमचा कोरला गेलेला.

Monday 6 July 2009

६ जुलै १७३५

६ जुलै १७३५ - मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास आले तेव्हा पेशवे बाजीराव थोरले त्यांना भेटण्यास घोरपडीपावेतो सामोरे गेले.

Saturday 4 July 2009

४ जुलै १७२९

४ जुलै १७२९ - सरखेल कान्होजी आंग्रे स्मरणदिन. समाधी स्थळ - ठुकराली नका, अलिबाग.


तुकोजी संकपाळ व बिम्बाबाई चा हा मुलगा राजगुरुनगर येथे जन्मला. नवसाने आणि अंगाऱ्या धूपाऱ्याने जन्मला म्हणुन आडनाव आंग्रे लाविले. त्यांनी ३ लग्ने केली. पाहिली पत्नी राजूबाई / मथुराबाई कडून त्यांना सेखोजी आणि संभाजी उर्फ़ आबासाहेब अशी २ मुले झाली. सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नाव वरुन ठेवले गेले. दूसरी पत्नी राधाबाई / लक्ष्मीबाई कडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले. तर तिसरी पत्नी गहिणबाई कडून त्यांना येसाजी व धोंडजी असे २ पुत्र झाले. या शिवाय शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव 'लाडूबाई' ठेवले गेले.

छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दीकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला. पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी अंग्रे यांना सरखेल (आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले. ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांसकडेच होते. मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी पार पाडले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांना त्यांनी चांगलेच जेरिस आणले आणि संपूर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.

१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट पडल्यावर मात्र त्यांनी कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला. मात्र पुढे त्यांचे बालमित्र असलेले बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.

सरखेल कान्होजी आंग्रे यांची मुद्रा - "शाहूकार्ये धुरंदर तुकोजी तनुजनमानहा कान्होजी सरखेलस्य
मुद्री येकम विराजते"

पुढे त्यांनी अलीबाग हे आपले मुख्य ठाणे बनवले जेथे आजही त्यांचे वंशज राहतात. ४ जुलै १७२९ रोजी ह्या विराला मरण आले. परकियांची सत्ता या भूमीत रोवु न देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी पार पाडले. त्यांना लक्ष्य लक्ष्य प्रणाम ...

Wednesday 1 July 2009

१ जुलै १६९३

१ जुलै १६९३ -छत्रपति संभाजी राजांच्या मृत्यूनंतर मोघलांकड़े गेलेल्या सिंहगडचा ताबा 'नवजी बलकावडे' या सरदाराने परत स्वराज्यात आणला.